14 जून 2025 आज हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक रक्तदाते दिन World Blood Donor Day म्हणून साजरा केला जात आहे. यावर्षीची थीम आहे “रक्त द्या, आशा द्या – एकत्र येऊन जीव वाचवूया”. या निमित्ताने भारतातील रक्तदानाच्या परिस्थितीचा आढावा घेणे अत्यंत गरजेचे आहे.
रक्तदान करणे ही सर्वात महान अशी सामाजिक सेवा आहे, जी कोणत्याही आर्थिक मोबदल्याशिवाय करता येते आणि तुम्ही डोनेट केलेल्या एका रक्ताच्या पिशवीमुळे तीन जणांचे प्राण वाचू शकतात. अपघात, शस्त्रक्रिया, गरोदर महिलांची प्रसूती, थॅलेसीमिया आणि सिकल सेल आजार असलेल्या रुग्णांसाठी रक्त जीवनदायी असते.
भारतात दरवर्षी अंदाजे 14.6 दशलक्ष रक्त युनिट्स (स्टोरेज बॅग्ज) रक्ताची आवश्यकता असते. परंतु आजही 1दशलक्ष युनिट्सचा तुटवडा कायम आहे. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये रक्ताची अनुपलब्धता ही रुग्ण मृत्यूचे प्रमुख कारण बनत आहे.
•देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही कार्यक्षम रक्तबँका उपलब्ध नाहीत.
•साठवण आणि वितरण यंत्रणेत अकार्यक्षमता असल्याने दरवर्षी लाखो युनिट्स वाया जातात.
•काही ठिकाणी एका संक्रमणासाठी 4500 पर्यंत खर्च येतो, जो सर्वसामान्यांसाठी परवडणारा नाही.
•विशेष रक्त घटक जसे की ल्युकोरिड्यूस्ड किंवा फेनोटायपिकली जुळणारे रक्त सहज उपलब्ध होत नाही.
सुधारणांची गरज
•‘हब अँड स्पोक’ मॉडेलचा अवलंब करून मोठ्या शहरांतील रक्तबँका (हब) आणि ग्रामीण भागातील केंद्रे (स्पोक) यांच्यात समन्वय निर्माण करणे.
•स्वयंस्फूर्त रक्तदानाचे प्रमाण वाढवणे, जे सध्या फक्त 70 टक्क्यांपर्यंत सीमित आहे.
•शाळा, महाविद्यालये व सामाजिक संस्था यांच्यामार्फत जनजागृती मोहीम राबवणे.
•तंत्रज्ञानाच्या साहाय्याने (मिस्ड कॉल, अॅप्स, डिजिटल पोर्टल) रक्तदान सुलभ करणे.
•रक्तबँकांमध्ये SOP पालन, कर्मचार्यांचे प्रशिक्षण व इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन आवश्यक.
जागतिक रक्तदाते दिन World Blood Donor Day हा केवळ साजरा करण्याचा दिवस नसून कृतीचा आणि जनजागृतीचा दिवस आहे. रक्तदानाच्या संस्कृतीला चालना देऊन आणि सक्षम आरोग्य यंत्रणा उभी करून आपण हजारो जीव वाचवू शकतो. भारतात प्रत्येक व्यक्तीने वर्षातून दोन वेळा रक्तदान केल्यास, देशात रक्ताच्या कोणत्याही कमतरतेचा प्रश्नच उरणार नाही.