kargil vijay diwas 2025: कारगिल युद्ध ते ऑपरेशन सिंदूर ; भारताच्या लष्करी इतिहासातील दोन निर्णायक टप्पे
26 जुलै 1999 रोजी भारताने कारगिल युद्धात विजय मिळवला आणि आज 26 वर्षांनंतर, भारत पुन्हा एकदा आपल्या लष्करी क्षमतेचा जोरदार परिचय ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून जगाला दिला आहे. कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर आणि ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे भारताच्या लष्करी इतिहासात दोन टप्प्यांमधील हा प्रवास अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
कारगिल युद्ध हे थेट लष्करी संघर्षाचे प्रतीक होते. 3 मे 1999 पासून सुरू झालेल्या या युद्धात भारतीय जवानांनी प्रतिकूल परिस्थितीतही पाकिस्तानच्या घुसखोरीला रोखत सर्व प्रमुख उंचीवरील भाग पुन्हा ताब्यात घेतला. सुमारे दीड महिना चाललेल्या या संघर्षात 527 भारतीय जवानांनी बलिदान दिले.
दुसरीकडे, 2025 मधील ऑपरेशन सिंदूर हे पारंपरिक युद्धाच्या पलीकडे जाऊन तांत्रिक, रणनीती आणि अचूकतेवर आधारित युद्ध होते. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर केवळ 25 मिनिटांत अचूक हल्ले करून पाकिस्तानला जबरदस्त धक्का दिला. हे ऑपरेशन पूर्णपणे “नॉन-कॉन्टॅक्ट वॉरफेअर” होते, ज्यात क्षेपणास्त्र, ड्रोन, AI प्रणाली आणि अचूक लक्ष्यनिर्देशन तंत्रज्ञानाचा वापर झाला.
या दोन्ही मोहिमांचा उद्देश समान होता भारताच्या सीमांचं संरक्षण आणि दहशतवादाला ठोस प्रत्युत्तर. मात्र, 1999 मध्ये भारताने रक्षात्मक भूमिका घेत लढा दिला, तर 2025 मध्ये भारत आक्रमकपणे पुढे जाऊन दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करत “नवे भारत” म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.
तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताने मोठी झेप घेतली आहे. कारगिलच्या काळात वापरली जाणारी INSAS रायफल्स, Bofors तोफा आणि MiG-21 सारखी जुनी साधने आता SIG716i रायफल्स, K9 वज्र तोफा, आणि आकाश क्षेपणास्त्र प्रणालीने बदलली गेली आहेत. ड्रोन, AI आधारित व्यवस्थापन आणि अत्याधुनिक रडार यामुळे भारताची युद्धनीती ‘प्रतिक्रिया’ वरून ‘पूर्वतयारी’वर केंद्रित झाली आहे.
कारगिल आणि सिंदूर या दोन लढायांमध्ये तंत्र, वेळ आणि पद्धती वेगळ्या असल्या तरी संदेश मात्र एकच – भारत आपल्या सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड करत नाही, आणि आक्रमण करणाऱ्यांना तीव्र आणि स्पष्ट उत्तर देतो.