कोल्हापुरात सकल हिंदू समाजाकडून उद्या जनआक्रोश मोर्चा
कोल्हापुरात सकल हिंदू समाजाकडून उद्या जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि गो-हत्या बंदीबाबत कडक कायदे करावेत, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. जनआक्रोश मोर्चासाठी कोल्हापुरात पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. व्हीनस कॉर्नर गाडी अड्डा, दसरा चौक, 100 फुटी रस्ता खानविलकर पेट्रोल पंपाजवळ, शहाजी महाविद्यालयात पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
उद्याच्या मोर्चाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने विरोध केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 'लव्ह जिहाद'चे खोटे कारण पुढे करत भाजपच्या चिथावणीने मोर्चे काढले जात असल्याचे म्हटले आहे. मोर्चावेळी अंबाबाई मंदिर परिसराकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी असेल. मोर्चाचा मार्ग वगळून इतर रस्त्यावरून भाविक, पर्यटकांनी चालत अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी जावे, असे आवाहन वाहतूक नित्रंयण शाखाच्या पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी केले आहे.
हा मोर्चा बिंदू चौकातून सुरु होईल. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, छत्रपती शिवाजी चौक मार्गे मोर्चा भवानी मंडप कमानीबाहेर येईल व तेथे मोर्चाची सांगता होईल. सर्व समाजाने मोर्चावेळी दुकाने, व्यापार, उद्योग बंद ठेवून मोर्चात सहभाग होण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आले आहे.