'उशिरा सुचलेलं शहाणपण' राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. यावर महाराष्ट्र महापुरुषांच्या योगदानासाठी ओळखला जातो. मात्र आक्षेपार्ह वक्तव्यांनी महाराष्ट्राची नाचक्की झाली. ज्या पद्धतीने राज्यपालांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी टीका केली आहे.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, महाराष्ट्राला वेगळी परंपरा लाभलेली आहे, मात्र राज्यपालांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नाचक्की केली. त्यावरून राज्यात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. आज ज्या पद्धतीने राजीनामा मंजूर करण्यात आला आहे, हे उशिरा सुचलेलं शहाणपण असून राज्यपालांना दोन महिन्यांपूर्वीच हटवणं गरजेचे होत असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, आता जे नवीन राज्यपाल नियुक्त झाले आहेत, त्यांना सुद्धा विनंती असेल की महाराष्ट्राला वेगळा इतिहास आहे. महाराष्ट्राने विविध नेते महापुरुष घडवले आहेत. राज्यपाल हे पद घटनात्मक पद असून राज्यातील लोक हे त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहतात. महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची परंपरा ही देशासह देशाबाहेर नेण्याची जबाबदारी ही नव्या राज्यपालांनी घेणं महत्त्वाचं आहे. जुन्या राज्यपालांनी ज्यावेळी अशी वक्तव्य केली, त्याचवेळी हा निर्णय घेणे अपेक्षित होतं, अनेकांनी त्यावेळी राज्यपालांना विरोध केला, त्यांना कोणी पाठीशी घातलं, त्यांना कोणी सपोर्ट केला. हे सगळ्यांना माहिती आहे. आता राज्यपालांचा राजीनामा मंजूर केला हे म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे.