गुरुवारी अहमदाबादच्या मेघाणी परिसरात एक धक्कादायक दुर्घटना घडली. लंडनकडे निघालेलं एअर इंडियाचं प्रवासी विमान टेकऑफवेळी कोसळलं. या विमानात एकूण 242 प्रवासी होते. सुदैवाने काही जण वाचले असून जखमींवर तातडीने जवळील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. या अपघातानंतर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, विमान अपघाताचा धोका जाणवला, तर प्रवाशांनी नेमकं काय केलं पाहिजे? अशा अति गंभीर प्रसंगी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काही खबरदारी घेणं गरजेचं ठरतं. अशा आपत्कालीन प्रसंगांमध्ये वाचण्याची शक्यता वाढवणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स खाली दिल्या आहेत:
विमानात जरा जरी हालचाल किंवा झटका जाणवला तरी लगेच सीटबेल्ट लावावा आणि तो क्रू सदस्य सांगेल तोपर्यंत काढू नये.
विमान धोक्याच्या स्थितीत असेल, तर डोकं गुडघ्यांकडे झुकवून, हातांनी डोकं झाकून बसावं – ही ब्रेस पोझिशन आपले डोके, मान व कंबरेचे संरक्षण करते.
आपल्या सीटजवळ असलेली आपत्कालीन मार्ग/दारे कुठे आहेत याचा अंदाज ठेवावा. अंधार किंवा धुरामुळे अडथळा आल्यासही तेथे पोहोचता यावे, यासाठी जागेची कल्पना मनात तयार ठेवा. घाई किंवा गोंधळ न करता, विमानातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणेच वागा.
अशा प्रसंगात घाबरणं स्वाभाविक आहे, मात्र शक्य तितकं मन शांत ठेवून निर्णय घेणं व कृती करणं अधिक फायदेशीर ठरतं.
संकटाच्या वेळी जीव सर्वात महत्त्वाचा आहे. सामान उचलण्यात वेळ वाया घालवू नका.
आकडेवारीनुसार विमानाचा शेवटचा भाग तुलनेने सुरक्षित असतो. त्यामुळे सीट निवडताना हे लक्षात घ्या.
आपत्कालीन मार्गाजवळ बसल्यास संकटाच्या वेळी विमानाबाहेर लवकर पोहोचता येतं. प्रवासाच्या आधी विमानातील सुरक्षा उपाय, एक्झिट स्थानं, व आपत्कालीन प्रक्रियांची माहिती नीट समजून घ्या. सुरक्षेचे व्हिडिओ व सूचना काळजीपूर्वक पाहा.
महत्त्वाची सूचना: वरील उपाय प्रत्येक परिस्थितीत जीव वाचवतीलच, याची खात्री देता येत नाही. मात्र या सवयींमुळे सतर्कता वाढते, आणि त्यामुळे संकटाचा परिणाम कमी होण्याची शक्यता नक्कीच वाढते.