मुंबई-बेंगलोर महामार्गावर ट्रक व खाजगी बसचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू तर 22 जखमी
पुणे : मुंबई-बेंगलोर महामार्गावर ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात झाल्याचे समोर येत आहे. शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास स्वामी नारायण मंदिराजवळ ही घटना घडली. या अपघातात चार जण जागीच ठार झाले तर 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
नीता ट्रॅव्हलची बस (क्र.एमएच 03 सीपी 4409) कोल्हापूरहून डोंबिवली येथे जात होती. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास स्वामीनारायण मंदिर जांभुळवाडी येथे ट्रक (क्र. एमएच 10 सीआर 1224) या ब्रेक फेल झाल्याने नीता ट्रॅव्हल्सच्या बसला पाठीमागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बस तसेच ट्रकही पलटी झाला.
या बसमधील एकूण १९ प्रवासी व ट्रक मधील 3 जण असे एकूण 22 जण जखमी झाले असून इतर चार प्रवासी मयत झाले आहेत. जखमी अवस्थेत असलेल्या एकूण २२ जणांना पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. अपघातात जखमी नागरीकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.