एमपीएससी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ द्या; छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

एमपीएससी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ द्या; छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

एमपीएससीकडून अर्ज स्वीकारले जात नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने माहिती व जनसंपर्क विभागातील विविध पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. मात्र ऑनलाईन प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी असल्याने पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक पत्रकारिता पदव्युत्तर पदवीधारकांचा जीव टांगणीला लागला आहे.

याबाबत तातडीने तांत्रिक त्रुटी दूर करून पदव्युत्तर पदवी धारकांचे अर्ज स्वीकारण्यात येऊन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी या पदांसाठी जम्बो भरतीची जाहिरात प्रसिध्द केली आहे. या जाहिरातीसाठी पत्रकारिता व जनसंपर्क क्षेत्रातील उच्च शैक्षणिक अर्हता असतांनाही उमेदवारांचे ऑनलाईन अर्जासाठी अपात्र असल्याचे संदेश येत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या हेल्पलाईनच्या माध्यमातून उमेदवारांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे राज्यातील लाखो पत्रकारिता पदव्युत्तर पदवीधारकांचा जीव टांगणीला लागला आहे. कधी नव्हे अनेक वर्षापासून उपलब्ध झालेली संधी एमपीएससीच्या चुकीच्या ऑनलाईन प्रक्रीयेमुळे गमाविण्याची भीती तरूणांमध्ये निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सामान्य प्रशासन विभागाच्या मागणीपत्रानुसार माहिती व जनसंपर्क विभागाकडील उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी या वर्ग-१ व वर्ग-२ पदांची जाहिरात ही ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रसिध्द केली आहे. या सर्व पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत २३ जानेवारी २०२३ आहे. मागील दहा वर्षात भरल्या गेल्या नसतील त्यापेक्षा कित्येक पट जागांसाठी यावेळी सरळसेवा भरती निघाली आहे.

मात्र सदर भरती प्रक्रियेतील जाहिरातीत स्पष्टपणे पत्रकारितेतील पदवी नमूद केले असतांनाही उमेदवार जेव्हा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जातो तेव्हा त्याला ‘आपल्याकडे सदर पदांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता नसल्यामुळे अर्ज करण्यास पात्र नाहीत’ असा संदेश येतो. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करता येत नाही. पत्रकारितेची बॅचलर व डिप्लोमा ही डिग्री घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येत आहे. मात्र पत्रकारिता व जनसंपर्क विषयात ख्यातनाम विद्यापीठातून कला पारंगत पदवी (पदव्युत्तर पदवी) घेतलेले विद्यार्थी अपात्र ठरत असल्याचे छगन भुजबळ यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com