वटवाघळांपासून द्राक्षे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा देशी जुगाड; सर्वत्र चर्चा
संजय देसाई | सांगली : द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यात हजारो एकर शेती द्राक्ष लागवडीखाली आहे. अवकाळी पाऊस, धुके, वेगवेगळ्या बुरशी अशा अनेक आव्हानांना तोंड देऊन येथील द्राक्ष बागायतदार शेतकरी मोठ्या कष्टाने लाखो रुपयांची कमाई करत देशाला परकीय चलन मिळवून देत आहे. पण, या शेतकऱ्यांना रोज एका समस्येला तोंड द्यावे लागते आहे. आता द्राक्ष बागांवर वटवाघळांच्या हल्ल्यांचे एक नवीनच संकट घोंघावत आहे.
शेतकऱ्यांना रोज एका समस्येला तोंड द्यावे लागते आहे. पण, या हुशार शेतकऱ्यांनी त्यावर देखील एक शानदार उपाय शोधून काढला आहे. त्यांनी चक्क मासे पकडण्यासाठी कोळी लोक जी जाळी वापरतात ती जाळी द्राक्षबागांवर अंथरून वटवाघळांच्या होणाऱ्या हल्ल्यांना चांगलीच मात दिली आहे.
वटवाघळे द्राक्ष बागेवर रात्रीची हल्ले करतात. आणि आपल्या टोकदार चोचीने द्राक्ष मणी फोडतात. सकाळी पाहिले तर बागेत द्राक्षांचा अक्षरशः सडा पडलेला दिसून येतो. आणि शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. पण, आता ही जाळी अंथरल्याने वटवाघळे द्राक्षांच्या मण्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे द्राक्षबागांचे नुकसान टळत आहे.
यापूर्वी शेतकरी मोठे मोठ्या पॉवरचे बल्ब लावून वटवाघळांच्या हल्ल्यावर तोड काढण्याचा प्रयत्न करत होते. पण, हे अत्यंत खर्चिक असल्याने सर्वच शेतकऱ्यांना शक्य होत नव्हते. फटाके लेऊन वटवाघळांना हुसकावून लावणे प्रॅक्टिकली शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी हा माशांची जाळी लावण्याचा जुगाड आता अंमलात आणला आहे. आणि तो चांगल्या प्रकारे वर्क आऊट होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान वाचत आहे.