शिक्षणाचा उपयोग कृषी विकासासह देशाच्या समृद्धीसाठी करा; राज्यपालांचे प्रतिपादन
निस्सार शेख | रत्नागिरी : शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरीसाठी न करता युवकांनी राज्य व देशाच्या समृद्धीसाठी आपल्या ज्ञानाचा वापर करावा, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केले. विद्यापीठाचा 41 वा पदवीदान समारंभ दापोली येथील अध्यापिठाच्या डॉ. विश्वेश्वरय्या सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास प्रकुलपती व कृषी मंत्री अब्दुल सत्तार केंद्रीय कृषी विश्वविद्यालय इंफाळ येथील कुलपती व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक पद्मश्री डॉ. एस. अय्यपन तसेच रत्नागिरी व रायगडचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय सावंत तसेच आमदार योगेश कदम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.भरत साळवी आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
देशात शहरीकरणाचा जोर वाढत आहे अशा पार्श्वभूमीवर शेतीला अधिक महत्त्व प्राप्त होणार असून येणाऱ्या काळात इतर धनसंपत्तीपेक्षा ज्याच्याकडे शेती आहे असे शेतकरी संपन्न व्यक्ती म्हणून ओळखले जातील. भावी पिढ्यांसाठी शेतीमधील गुंतवणूक आणि त्यातील उत्पादन यांचे महत्त्व अनन्यसाधारण राहणार आहे, असे राज्यपाल यावेळी म्हणाले.
विद्यापीठाचे प्रतिकूलपती व राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आगामी काळात कृषी विद्यापीठांमधील सर्व सर्व रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे राज्यपालांनी आपल्या विधानसभेतील अभिभाषणात सांगितले होते, त्याची पूर्तता कृषी विभाग करेल आणि कृषी विभागांतर्गत सर्व पदे भरली जातील याची काळजी शासन घेत आहे, असे सांगितले.
दरम्यान, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय सावंत यांचे प्रास्ताविक भाषण झाले त्यांनी यात आजवर झालेल्या विद्यापीठातील संशोधनांची माहिती सादर केली तसेच विद्यापीठ राबवित असलेले विविध उपक्रम आणि संशोधने याबाबत माहिती दिली. पदवीदान सोहळ्यापूर्वी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनचे उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या हस्ते झाले. त्यांनी स्वतः यातील प्रत्येक दालनास भेट देऊन विविध संशोधनांची माहिती जाणून घेतली.