जेजुरीच्या नवनिर्वाचित विश्वस्त निवडीचा वाद चिघळणार; नेमके काय झालं?
अमोल धर्माधिकारी | जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीत, खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन, जत्रा -यात्रा उत्सवांचे नियोजन पाहणाऱ्या मार्तंड देवसंस्थान समितीवर गेल्या आठवड्यात 'सात' विश्वस्तांच्या निवडी झाल्या. या निवडीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना डावलून जेजुरी बाहेरील सहा जणांच्या निवडी राजकीय हस्तक्षेपामुळे करण्यात आल्या आहेत. यामुळे जेजुरी शहरात प्रचंड नाराजीचा सूर आहे. आज झालेल्या ग्रामसभेत उद्या रास्ता रोको आणि चक्री उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
देवसंस्थाच्या 7 विश्वस्तांपैकी 5 ते 6 विश्वस्त हे एकाच राजकीय पक्षाशी निगडीत असून ते बाहेरील रहिवासी आहेत. निवडीमध्ये एकच विश्वस्त स्थानिक निवडला असून जेजुरीतील सेवेकरी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना राजकीय हस्तक्षेप होत डावलले गेले आहे. ही बाब ग्रामस्थांसाठी अत्यंत दुर्दैवी आहे.
मागील विश्वस्तांची मुदत डिसेंबर 2022मध्ये संपल्याने धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून जाहीर निविदा प्रसिद्ध करून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार 500पेक्षा अधिक अर्ज सादर झाले होते. त्यापैकी 95 अर्ज अपात्र ठरविण्यात आले तर 350 पेक्षा अधिक व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पुढील काळात शहरातील किमान 4 जण निवडण्यात याव्यात, अशी मागणी शहरातील अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली होती.
मुलाखती वेळी जेजुरी गडाला पायऱ्या किती? देवांची भूपाळी-आरती येते का? गाभाऱ्यात मूर्ती किती? जत्रा-यात्रा उत्सवांचे महत्त्व? देवसंस्थान निगडित अनेक प्रश्न मुलाखत देणाऱ्या उमेदवारांना विचारण्यात आले होते. मात्र, जेजुरीकर ग्रामस्थांना डावलून पुणे जिल्ह्यातील इतरत्र रहिवासी असलेल्या 5 व्यक्तींना निवडताना कोणते निकष लावले आहेत? मंदिरावर स्वतःच्या पक्षाची पकड राहावी म्हणूनच पक्षश्रेष्ठींनी निवड प्रक्रियेत हस्तक्षेप केला आहे. हा जेजुरीवासीयांवर अन्याय आहे. संतप्त प्रतिक्रिया जेजुरी शहरातून येत आहेत