परिक्षेच्या आधीच फुटला बारावीचा गणिताचा पेपर फुटला
बुलढाणा : राज्यात बारावीचे पेपर सुरु आहेत. अशातच, बुलढाणा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिंदखेडराजा येथे परीक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून विधीमंडळातही यांचे पडसाद उमटले आहे. विरोधकांनी पेपरफुटी प्रश्नी सरकारला चांगलेच धारेवर धरले.
बारावीचे पेपर सुरु आहेत. आज सकाळी साडे दहा वाजताच बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे गणिताचा पेपर फुटला. गेल्या काही दिवसात राज्यात पेपरफुटीचे प्रकार वाढले आहेत. अभ्यास करणाऱ्या मुलांवर हा अन्याय आहे. पेपरफुटीच्या मागे कोणते रॅकेट कार्यरत आहे का ? याची सखोल चौकशी केली पाहिजे. बारावीची परिक्षा देणाऱ्या मुलांचे हे नुकसान आहे. दोषीवर कठोर कारवाई करुन राज्यात सातत्याने सुरु असणारे असे गैरप्रकार थांबले पाहिजेत. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची मागणी अजित पवार यांनी केली.
तर, अंबादास दानवे म्हणाले, पेपर सुरू होण्याच्या आतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. सरकारच्या अपूर्ण घोषणा फोल ठरल्या आहेत. शिक्षण विभागातील अधिकारी साथ देत असतील तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. पेपर फुटण्यामध्ये सरकारचीच भूमिका आहे की काय, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, बारावीच्या परीक्षांची सुरुवातच गोंधळाने झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पहिलाच पेपर इंग्रजीमध्ये तीन प्रश्नांमध्ये एका प्रश्नाऐवजी चक्क उत्तरच देण्यात आले होते. तर इतर दोन प्रश्नांमध्ये प्रश्नाऐवजी तपासणाऱ्याला सूचना दिल्या होत्या. चूक लक्षात आल्यानंतर गुणांची भरपाई विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.