पालघरची पुनरावृत्ती; मुले पळवणारी चोरांची टोळी समजून चौघा साधूंना बेदम मारहाण
संजय देसाई | सांगली : मुले पळवणारी चोरांची टोळी समजून चौघा साधूंना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जत तालुक्यातल्या लवंगा या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेश मधील लवंगा या ठिकाणी आलेल्या चौघा साधूंना चोर समजून ग्रामस्थांनी ही मारहाण केली आहे. सुदैवाने पालघर सारखी घटना होता-होता टळली आहे. या घटनेची नोंद उमदी पोलिस ठाण्यामध्ये झाली आहे.
जत तालुक्यातल्या उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लवंगा येथे चौघा साधूंना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. उत्तरप्रदेश मधील मथुरा येथील चौघे साधू हे कर्नाटक या ठिकाणी देवदर्शनासाठी आले होते, त्यानंतर ते विजापूरहुन जत तालुक्यातल्या लवंगामार्गे पंढरपूर या ठिकाणी देवदर्शनासाठी निघाले होते.
यावेळी लवंगा या चौघा साधूंनी रात्रीच्या सुमारास गावातल्या एका मंदिरामध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर सकाळी हे चौघेही साधू गाडीतून निघाले असता, एका मुलाला त्यांनी रस्ता विचारला. त्यातून काही ग्रामस्थांना ही मुले चोरणारी टोळी असल्याचा संशय आला. यानंतर ग्रामस्थांनी या साधूंकडे चौकशी करायला सुरुवात केल्यानंतर साधू आणि ग्रामस्थांच्या मध्ये वादावादीचा प्रकार घडला. यातून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी साधूंना गाडीतून बाहेर काढून बेदम मारहाण केली. लाठी-काठी आणि पट्टयाने जबर मारहाण यावेळी करण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली होती. त्यानंतर या साधूंकडे चौकशी केली असता या त्यांच्याकडे मिळालेल्या आधार कार्डनुसार ते उत्तर प्रदेशचे असल्याचे समोर आले. यासंबंधित उत्तर प्रदेश मधील त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, हे सर्व मथुरा येथील श्री पंचनामा जुना आखडयाचे साधू असल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, याआधीही पालघर जिल्ह्यात अशी घटना घडली होती. गडचिंचले गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रितपणे पहारा देण्याचा निर्णय घेतला होता. 16 एप्रिल रोजी रात्री उशिरा इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या मार्गावर मोठ्या जमावाने त्यांची गाडी अडवली. त्यांची पूर्णपणे विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला होता.