अमरावतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीक विमा समनव्यक यांचे हात बांधले
सूरज दाहाट|अमरावती: खरीप हंगामात सोयाबीन पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी २५ टक्के अग्रीम रक्कम देण्यास विमा कंपनीने अजूनही नकार कायम ठेवला आहे. खरीप हंगामात अमरावती जिल्ह्यातील ८० महसूल मंडळांत अतिवृष्टी व संततधार पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास भरपाई मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी विमा काढला आहे.
मात्र, विमा कंपनीने अजून पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा न दिल्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कपिल पडघम ,प्रशांत शिरभाते यांनी अमरावती जिल्हा कृषी अधीक्षक कृषी कार्यालयात आंदोलन करत जिल्हा पीक विमा समनव्यक यांचे हात बांधून ठेवत त्यांना कक्षातच नजर कैदेत ठेवले आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी त्यासंबंधीच्या पूर्वसूचनाही दाखल केल्यात. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत अतिवृष्टीग्रस्त ८० महसूल मंडळांतील सहभागी सोयाबीनच्या टक्के अग्रीम देण्याची अधिसूचना १३ सप्टेंबरला काढली होती. त्यानुसार शेतकऱ्यांना अग्रीम मिळणे अपेक्षित होते. मात्र कंपनीने त्यावर आक्षेप घेत अग्रीम देण्यास नकार दिला त्यामुळे जिल्ह्यात आता शेतकऱ्यांसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या व पूर्वसूचना दाखल करणाऱ्या १६ हजार ५५८ शेतकऱ्यांना विमा कंपनीने अपात्र ठरविले आहे. त्यांचे सर्व्हेक्षण करण्याच्या जिल्हाधिकारी व कृषी आयुक्तांच्या आदेशालाही विमा कंपनीने ठेंगा दाखवला आहे. आदेश असताना एकाही प्रकरणात कंपनीकडून सर्व्हेक्षण करण्यात आलेले नाही हे विशेष, दरम्यान या ठिकाणी आता गाडगे नगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहे सध्या कृषी विभाग व पिक विमा कंपनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्या सोबत चर्चा करीत आहे, मात्र गेल्या तासाभरापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरूच आहे जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे सध्या या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त सुद्धा वाढवलेला आहे.