Lokshahi Marathwada Sanwad 2025 : "जाणूनबुजून अल्टीमेटम देण्याची वेळ...", मनोज जरांगेंचा सरकारवर निशाणा
'लोकशाही मराठी' चॅनलतर्फे छत्रपती संभाजी नगरमध्ये 'लोकशाही मराठवाडा संवाद 2025' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान मराठवाड्यातील अनेक दिग्गजांचा सत्कारदेखील केला गेला. मराठवाड्याच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी राजकीय नेत्यांचे व्हिजन काय आहे? तसेच मराठवाड्याच्या विकासाचा रोडमॅप कसा असावा? याबद्दल सविस्तरपाने चर्चा करण्यात आली आहे. दरम्यान आता या कार्यक्रमामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यामुळे समोर आलेले मनोज जरांगे पाटीलदेखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी सरकारला सतत अल्टीमेटम देण्याबद्दल भाष्य केले आहे.
'लोकशाही मराठवाडा संवाद 2025' या कार्यक्रमासाठी मनोज जरांगे पाटील यांना विचारले कि, "तुम्ही सातत्याने सरकारला अल्टीमेटम देत आहात. आता पुन्हा एकदा तुम्ही सरकारला अल्टीमेटम दिला आहे. तर सरकार आता यावर काही कारवाई करेल अशी अपेक्षा आहे का?तसेच यावेळी तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत तसेच प्रमुख उद्देश काय असणार आहे?". यावर जरांगे यांनी उत्तर दिले की, "जाणूनबुजून अल्टीमेटम देण्याची वेळ सरकार आमच्यावर आणत आहे. एक गरिबाचं लेकरू मायबाप या नजरेने सरकारकडे बघत आहे. परंतु सरकारची माया गोरगरिबांच्या लेकरांसाठी जागी होत नाही आहे. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला अल्टीमेटम द्यावा लागत आहे".
पुढे ते म्हणाले की, "सरकारचं आणि आमचं असं काही वैर नाही. परंतु जनहित खूप महत्त्वाचे आहे. आमच्या भविष्यावर आणि अस्तित्वावर घाला घातला गेला आहे. तिथेच आमचा गळा दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. ज्या गोरगरीब जनतेने स्वप्न बघितलं आहे आणि जी स्वप्न उराशी बाळगली आहेत. आपण प्रगती किंवा परिवर्तनाकडे गेलो पाहिजे असं वाटत पण सरकार तिथपर्यंत पोहचू देत नाही आहे. त्यामुळे आम्हाला अल्टीमेटम द्यावा लागतो".
पण सरकारने तुमच्या मनासारखं करावं? ही अपेक्षा आहे का? या प्रश्नावर जरांगे यांनी उत्तर दिलं की, "आमच्या मनासारखं व्हावा असं नाही. पण जे लोकशाहीला मान्य आहे ते व्हावं".