Aaditya Thackeray : मुख्य आणि दोन उप मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले नसतील, तर दिले कोणी?
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचे पडसाद राज्यभरात उमटत असून राज्याचे राजकारणही चांगलेच तापले आहे. याठिकाणी राजकीय नेत्यांनी भेट दिली आहे. पोलिसांना लाठीचार्जचा आदेश वरिष्ठांनी दिल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला.
याच पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, एका बाजूला गद्दार आमदार माणसं पाठवून भर रस्त्यात पत्रकारांना मारहाण करवतात, गणपती बाप्पा च्या मिरवणुकीत आणि पोलीस स्टेशनमध्ये बंदूक दाखवून जनतेला धमकवतात, महिलांना शिवीगाळ करतात, त्यांची मुलं उद्योगपतींचं अपहरण करतात... आणि त्यावर कारवाई मात्र काहीच होत नाही!
पण त्याच वेळी मराठा समाजातले बांधव जेव्हा स्वतःच्या न्याय्य हक्कासाठी उपोषण करतात, तेव्हा त्यांची डोकी फोडली जातात आणि खोके सरकारमध्ये जनरल डायर अवतरतात! बरं, मुख्य आणि दोन उप मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले नसतील, तर दिले कोणी? सरकार चालतंय कसं? आपोआप? महाराष्ट्राने कधीही एवढा भ्रष्ट आणि निर्लज्ज कारभार पाहिला नव्हता! असे म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे.