गुजरातमधून 'आप'च्या महिला उमेदवार बेपत्ता; केजरीवालांचा भाजपवर अपहरणाचा आरोप
नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. या निवडणुकीत भाजपविरोधात आप सर्वशक्तीनिशी उतरली आहे. अशातच आपने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. आम आदमी पक्षाच्या उमेदवार बेपत्ता झाल्या असून भाजपने त्यांचे अपहरण केल्याचा आरोप आप नेत्यांनी केला आहे.
आम आदमी पक्षाच्या उमेदवार कांचन जरीवाल गुजरातमधील सुरत पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. परंतु, त्या कालपासून गायब झाल्याच्या भीतीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, सुरत (पूर्व) येथील आमची उमेदवार कांचन जरीवाला आणि त्यांचे कुटुंब कालपासून बेपत्ता आहे. प्रथम भाजपने त्यांचा अर्ज रद्द करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची उमेदवारी स्वीकारण्यात आली. त्यानंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. त्याचे अपहरण झाले आहे का, असा सवाल त्यांनी ट्विटरद्वारे उपस्थित केला आहे.
आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी कांचन जरीवाल यांच्या अपहरणाला लोकशाहीची हत्या म्हंटले आहे. ते म्हणाले, भाजपने सूरत पूर्व मतदारसंघातून आमच्या उमेदवार कांचन जरीवाला यांचे अपहरण केले आहे. प्रथम भाजपने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, नंतर त्यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले आणि आता त्यांचे अपहरण केले. काल दुपारपासून त्या बेपत्ता आहेत.
दरम्यान, गुजरातमध्ये एकूण 182 जागांसाठी 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. गुजरातमध्ये 2017 च्या निवडणुकीत भाजपच्या जागांची संख्या प्रथमच दुहेरी आकड्यांपर्यंत कमी झाली होती. या विधानसभा निवडणुकीत भाजपला 99 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला 77 जागा जिंकण्यात यश आले. गेल्या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी चांगली मानली जात होती.