udyanraje Bhonsle
udyanraje Bhonsle Team Lokshahi

नुपूर शर्मा प्रमाणेच राज्यपालांवर कारवाई व्हावी, उदयनराजेंची मागणी

आज 350 वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांवरचं जनतेचे प्रेम तसूभरही कमी झालं नाही. विविध धर्मियांकडून पुणे बंदला प्रतिसाद मिळाला.
Published by :
Sagar Pradhan

आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात बंद पाळण्यात आला. या बंद दरम्यान डेक्कन ते लालमहालापर्यंत मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये भाजपचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले देखील सहभागी झाले होते. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांवर बोलत रोखठोक प्रतिक्रिया दिली.

udyanraje Bhonsle
पुण्यातील बंद बेकायदेशीर, उदयनराजेंना अटक करा; वकील गुणरत्न सदावर्ते यांचे मागणी

नेमकं काय म्हणाले उदयनराजे भोसले?

पुण्यात बोलत असताना उदयनराजे म्हणाले की, आज 350 वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांवरचं जनतेचे प्रेम तसूभरही कमी झालं नाही. विविध धर्मियांकडून पुणे बंदला प्रतिसाद मिळाला. शिवरायांबद्दलचं हे प्रेम वाढतच जात असतानाच काही लोकांना महाराजांनी देशासाठी, महाराष्ट्रासाठी काय योगदान दिले समजावून सांगावं लागत आहे. महाराजांचा योग्य सन्मान व्हावा, हे सांगण्याची वेळ आमच्यावर आली आहे, हीच मोठी शोकांतिका आहे, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

फुटकळ, तुटपुंजे, विकृत लोकं कारण नसताना विधानं करतात. त्यांच्यामुळे शिवाजी महाराजांनी दिलेलं योगदान कमी होत नाही. पण शिवरायांचा सन्मान झाला पाहिजे, हे सांगण्याची वेळ आमच्यावर आली आहे. यापेक्षा जास्त मोठी शोकांतिका असू शकत नाहीत. असे उदयनराजे यावेळी म्हणाले. उदयनराजे यांनी यावेळी मागणी केली की भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्याविरोधात ज्या प्रमाणे शिस्तभंगाची कारवाई झाली होती. तशीच कारवाई राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर करावी. अशी मागणी उदयनराजे यांनी यावेळी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com