Ajit Pawar
Ajit Pawar Team Lokshahi

शशिकांत वारिसे हत्येचा मास्टरमाईंड शोधा, पोलिसांना ‘फ्री हॅण्ड’ दया; अजित पवार सभागृहात आक्रमक

पत्रकार शशिकांत वारिसे हत्ये प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक

मुंबई : राज्यात रिफायनरी विरोधात लिखाण केले म्हणून कोकणातील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यात आली, ही पुरोगामी महाराष्‍ट्रासाठी लाजिरवाणी घटना आहे. वारिसे यांची हत्या करणारा संशयित आरोपी हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांचे फोटो वापरुन रिफायनरीचे समर्थन करत होता. ही गंभीर बाब आहे.

पत्रकार वारिसे यांच्या हत्येची नि:पक्षपणे चौकशी करावी, पोलीसांना तपासात ‘फ्री हॅण्ड’ देण्यात यावा, तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घ्यावी. राज्यात पत्रकारांवर झालेला हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला असून पत्रकार वारिसे यांच्या हत्येच्या मागचा मास्टरमाईंड शोधण्याची मागणी विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.

Ajit Pawar
राज्य सरकार सीमा भागातील जनतेच्या पाठीशी ठाम; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सीमाप्रश्नावरील चर्चेवर विधानसभेत ग्वाही

अजित पवार म्हणाले, कोकणात रिफायनरी विरोधात लिखाण करणारे पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या गाडीला अपघात करुन त्यांना फरफटत नेले. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे. या हत्येतील संशयित आरोपी हा रिफायनरीचा समर्थक आहे. त्याने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांचे फोटो वापरुन रिफायनरीच्या जाहिराती केल्या आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे या हत्येचा तपास करणाऱ्या पोलिसांवर दबाव येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

पोलिसांना तपासात ‘फ्री हॅण्ड’ देण्यात यावा. या तपासात राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घ्यावी. विरोधी लिहितो म्हणून पत्रकारची हत्या करणे हा लोकशाहीवरचा हल्ला आहे, महाराष्ट्राची मान खाली घालविणारी घटना आहे. या प्रकरणाची सखोल तपासणी करुन यामागच्या मास्टरमाईंडचा शोध घेण्याची आक्रमक मागणी अजित पवार यांनी केली.

काय आहे नेमके प्रकरण?

रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या विरोधात बातमी देणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांना गाडीने उडवण्याचा प्रकार घडला आहे. कोकणात मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथे ही घटना घडली. सकाळी ज्याच्या विरोधात बातमी येते, त्याच्याच गाडीची धडक बसून पत्रकाराचा मृत्यू होतो, हा योगायोग असू शकतो? तर नक्कीच नाही. हा ठरवून घडवून आणलेला घातपात असून त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे राज्य प्रमुख एस.एम देशमुख यांनी केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com