'त्या' वक्तव्यावरून अजित पवार धीरेंद्र शास्त्रींवर संतापले; म्हणाले, मी त्यामुळे व्यथित...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी संत तुकाराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या विधानामुळे राज्यात एकच वातावरण तापले होते. या विधानावर अनेक नेत्यांनी भाष्य केले होते आणि वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. त्यावरच आता विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
बागेश्वर धाम महाराज यांच्या विधानावर बोलताना अजित पवार म्हणाले की, धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह असून मी त्यामुळे व्यथित झालो आहे. महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने मी त्यांचा निषेध करतो. तसेच बेताल वक्तव्यांविरोधात आता कायद्याची गरज आहे. लाखो वारकरी बांधव तुकाराम महाराजांच्या वचनाला आजही मानतो. हे अश्लाघ्य वक्तव्य केल्याबद्दल धीरेंद्र शास्त्री महाराजांवर कारवाई झाली पाहीजे. तसेच आगामी अधिवेशनात हा मुद्दा आम्ही उपस्थित करुन यावर कायदा करण्याची मागणी करणार आहोत. अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
पुढे त्यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावरील वक्तव्याबाबत विचारण्यात आले त्यावर अजित पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिले होते. २०२४ साली बिगर भाजपाची सत्ता आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना तुरुंगात टाकू, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यावर प्रश्न विचारला असता ‘नो कॉमेंट्स’ असे म्हणत अजित पवार यांनी उत्तर देण्यास टाळले.