मुख्यमंत्र्यांची चौफेर टीका; वाचा संपुर्ण भाषण जशास तसे
दोन आठवड्यांपूर्वी ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. आता त्याच सभेला उत्तर देण्यासाठी शिंदे गटाने त्याच ठिकाणी आज जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेच्या अनुषंगाने दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. याच सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच विषयावर भाष्य करत उध्दव ठाकरे यांच्या जोरदार तोफ डागली.
तोच तो थयथयाट, आदळआपट याला काय उत्तर देणार?
काही लोक ही सभा पाहात असतील. पण पूर्वी झालेली सभा, त्यावेळची गर्दी ही तुलना करायला आम्ही आलेलो नाही. गेल्या आठवड्यात याच महिन्यात एक फुसका बार, आपटी बार येऊन गेला. उत्तर आरोप किंवा टीकेला द्यायचं असतं. पण तोच तो थयथयाट, आदळआपट याला काय उत्तर देणार? मुंबईतही सहा महिन्यांपासून अशीच आदळआपट चालू आहे. तोच खेळ चालू आहे, फक्त जागा बदलली होती. महाराष्ट्रात सर्कशीप्रमाणे त्यांचे जागोजागी शो होणार आहेत. पण तेच टोमणे असतील. खोके आणि गद्दार, याव्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरा शब्द नाही. अशी टीका त्यांनी ठाकरेंवर केली.
तुम्ही बाळासाहेबांना चुकीचं ठरवलंत?
सत्तेसाठी तुम्ही शिवसेना एनसीपी, काँग्रेसकडे गहाण ठेवली. गद्दारी आम्ही नाही केली. गद्दारी 2019ला झाली. हिंदुत्वाचं राजकारण केलं ही चूक झाली असं विधानसभेत उद्धव ठाकरेंनी सांगितलं. म्हणजे तुम्ही बाळासाहेबांना चुकीचं ठरवलंत? बाळासाहेबांच्या भूमिकेला चुकीचं ठरवलंत. कशासाठी? सत्तेसाठी? यापेक्षा या महाराष्ट्राचं दुर्दैवं काय असू शकतं? असे देखील निशाणा त्यांनी यावेळी साधला.
वडील म्हणून छोटं करू नका
तुम्ही खोके, गद्दार म्हणून किती पाप झाकणार? बाळासाहेब ठाकरे तुमचे वडील होते हे किती वेळा सांगणार? हे जगाला मान्य आहे. पण बाळासाहेब तुमचे वडील असले, तरी ते सगळ्या शिवसैनिकांचं दैवत होते. तुम्ही त्यांना वडील म्हणून छोटं करू नका महाराष्ट्रातली जनता तुम्हाला माफ करणार नाही. असेही शिंदे यावेळी म्हणाले.
राहुल गांधींवर टीका
परदेशात या देशाची बदनामी करणारे राहुल गांधी यांना पंतप्रधान करायला निघालेल्या लोकांबरोबर आपण जाणार आहोत. बाळासाहेबांनी ज्यांना नेहमी दूर ठेवलं अशा लोकांना तुम्ही जवळ करणार का? बाळासाहेब म्हणायचे मला एक दिवस देशाचा पंतप्रधान करा, देशातलं ३७० कलम हटवतो. राम मंदिर बांधण्याचं स्वप्नं बाळासाहेबांचं होतं. मोदींच्या नेतृत्वाखाली अमित शाह यांनी ३७० कलम हटवून दाखवलं. मग बाळासाहेबांचं स्वप्नं कुणी पूर्ण केलं? मग आमचा निर्णय चूक आहे की बरोबर आहे? राहुल गांधीसह ठाकरेंवर यावेळी टीका केली.
मालमत्तेवर दावा सांगणार का?
तुम्ही बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार आहात. पण विचारांचा वारसा तुम्ही सोडलात. आम्हाला तुमची संपत्ती नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. मला पत्रकारांनी विचारलं की शिवसेना मिळाली, धनुष्यबाण मिळालं., तुम्ही त्यांच्या मालमत्तेवर दावा सांगणार का? बिलकुल नाही. असे देखील ते यावेळी म्हणाले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हायलाही तुमची जीभ कचरू लागली
राहुल गांधी काश्मीरमध्ये तिरंगा फडकवला म्हणून ऐटीत सांगत आहेत. पण मोदींनी ३७० कलम हटवलं नसतं, तर तुम्ही ते धाडस केलं असतं का? जो त्याच्या पक्षाचा अध्यक्ष होण्याची जबाबदारी घेऊ शकत नाही, तो देशाचा पंतप्रधान कसा होऊ शकतो? जो राज्य जिंकू शकत नाही, तो देश कसा जिंकू शकतो? तुम्ही अशा लोकांसाठी बाळासाहेबांचा मुलगा आणि नातू मतं मागतो? यापेक्षा या राज्याचं काय दुर्दैवं असू शकतं? असे शब्दांत त्यांनी ठाकरेंना सुनावले.
तुम्हाला सत्तेचा मोह झाला. तुम्हाला खुर्चीची भुरळ पडली.
तुम्ही म्हणाला होतात की मला मुख्यमंत्री व्हायचं नाही. मग म्हणालात पवारांनी सांगितलं की तुम्हालाच मुख्यमंत्री व्हावं लागेल. पण या प्रक्रियेत असणारे सगळे लोक माझ्या परिचित होते. तुम्हाला सत्तेचा मोह झाला. तुम्हाला खुर्चीची भुरळ पडली. तुम्ही ते वदवून घेतलंत. आनंद आहे. पण तुम्ही जेव्हा हिंदुत्वाबद्दल मूग गिळून गप्प बसलात, सावरकरांचा विषय आला, दाऊदचा विषय आला, हिंदुत्वाचे विषय जेव्हा आले, तेव्हा तुम्ही भूमिका बदलू लागलाग. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हायलाही तुमची जीभ कचरू लागली, यापेक्षा दुर्दैवं अजून काय असू शकतं? असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
तुम्हाला बोलायचा अधिकार काय आहे?
एकनाथ शिंदे वफादार आहे. हा गद्दार नाही, खुद्दार आहे. माझ्या रक्तात बेईमानी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर दत्ताजी शिंदे, महादजी शिंदेंनी बलिदान दिलं. मागे नाही हटले. हा मावळा तुमच्यासारखा सत्तेसाठी कधी मिंधा झाला नाही, होणार नाही. सांगतायत ५० लोकांनी खोके घेतले. रामदास कदमांनी आख्खं आयुष्य संघटनेसाठी दिलं. जीवाची बाजी लावली. घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. शेकडो केसेस अंगावर घेतल्या. तुम्ही त्यांना गद्दार म्हणताय? तुम्हाला बोलताना काहीतरी वाटलं पाहिजे. तुमच्यावर किती केसेस आहेत? या एकनाथ शिंदेवर १०९ केसेस आहेत. तुम्हाला बोलायचा अधिकार काय आहे? असा प्रखर सवाल त्यांनी यावेळी केला.
तुम्ही तर कार्यकर्त्यांना संपवायला निघाले.
बाळासाहेब असते, तर मनोहर जोशाींबद्दल असं केलं असतं? बाळासाहेब सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारे होते. आनंद दिघे जेव्हा तुरुंगात होते, तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी वैयक्तिक शब्द टाकला. माझं काही काम करू नको, पण आनंद दिघेला काढण्यासाठी मदत कर. तुम्ही तर कार्यकर्त्यांना संपवायला निघाले. असा पक्ष मोठा होऊ शकत नाही. कार्यकर्ते मोठे झाले, तर पक्ष मोठा होतो. एखादा कार्यकर्ता मोठा व्हायला लागला, तर त्यांची पोटदुखी सुरू होते.
जगात असा नेता कुठी मी पाहिला नाही
रामदास कदमांना मी सांगितलं की वर्धापनदिनी षण्मुखानंदला येऊ नका. पण त्यांनी यायचा आग्रह केला. तुम्ही कारस्थान करून मनोहर जोशींना खाली उतरवायला लावलं. तीच गत, तोच डाव रामदास कदम यांच्याबद्दल तुम्ही आखला होता. मी सांगितलं येऊ नका, रामदास कदमांनी माझं ऐकलं. असा कुठला पक्षप्रमुख आपल्याच नेत्यांच्याबद्दल अशी कारस्थानं करू शकतो? आपल्या आमदारांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी दुसऱ्या पक्षांची मदत घेऊन कटकारस्थान करू शकतो? या जगात असा नेता कुठी मी पाहिला नाही.
ठाण्यातला भगवा उतरू नये म्हणून गेला.
राज ठाकरे काय म्हणत होते? जिथे शिवसेना कमजोर आहे,. तो भाग मला द्या. मी शिवसेना वाढवतो., मोठी करतो. नारायण राणेंच्या बाबतीत काय झालं याचेही आम्ही सगळे साक्षीदार आहोत. आता तर आम्हाला सगळे भेटतात. बोलतात. पूर्वी आमच्यावर बंधनं होती, आता आम्ही मोकळे आहोत. ठाण्याच्या महापौरपदाची निवडणूक होती, तेव्हा मी राज ठाकरेंना सांगितलं की हा भगवा उतरू देऊ नका. राज ठाकरेंनी विनंती मान्य केली आणि आम्हाला पाठिंबा दिला. आमचं काय चुकलं? पण तेही तुम्हाला पटलं नाही. शेवटी बाळासाहेबांनी सांगितलं की हा एकनाथ स्वत:साठी गेला नाही, ठाण्यातला भगवा उतरू नये म्हणून गेला. कसा पक्ष पुढे जाणार?
काल आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार
माणसाला स्वत:च्या नेतृत्वावर विश्वास असायला हवा. किती लोक घालवलेत. नारायण राणे, राज ठाकरे, गणेश नाईकांपासून सगळे गेले. रामदास कदम, मलाही तुम्ही असंच केलं. जेव्हा स्वार्थ डोक्यात जातो, सत्तेची हव्यास जाते तेव्हा त्याला काहीह दिसत नाही, सुचत नाही. हा एकनाथ शिंदे आज, काल आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार.
मला तर माहितीच नव्हतं की मी मुख्यमंत्री होणार आहे.
ही सोन्यासारखी माणसं मला भेटायला येतात, तर त्यांना मी एक कप चहा पाजू शकत नाही? त्याचाही तुम्ही हिशोब काढता? अडीच वर्षं वर्षा बंदच होतं. पण आता हे वर्षा सगळ्यांसाठी खुलं आहे. हे वर्षा तुमचं आहे. मी कधीच मुख्यमंत्रीपदाचा मोह केला नाही. मला तर माहितीच नव्हतं की मी मुख्यमंत्री होणार आहे. म्हणतात याला फिरायला वेळच मिळतो. हा दिल्लीच्या वाऱ्या करतो. मी फिरणाराच मुख्यमंत्री आहे. मला घरात बसायला आवडत नाही. मला फिरायला आवडतं. मी दिल्लीला जातो. तिथे जाऊन महाराष्ट्रासाठी हजारो कोटी रुपये आपण आणले. दावोसला आपण गेलो, तेव्हा तुमच्या मुख्यमंत्र्यानं १ लाख ३७ कोटींचे एमओयू साईन केले. असे ते म्हणाले.
रामदास कदम मंत्री असल्यापासून एकच धोशा होता.
रामदास कदम म्हणाले की हा झोपतो कधी, उठतो कधी, जेवतो कधी. आता जास्त काम करावं लागतं. मी रात्री १२-१ वाजताही अधिकाऱ्यांना फोन करतो. तेही फोन उचलतात. कारण त्यांना माहिती आहे की हा मुख्यमंत्री रात्रीचा जागतो. आता सायलेंट सरकार नाही, अलर्ट सरकार आहे. सगळे अलर्ट मोडवर आहे. रामदास कदम मंत्री असल्यापासून एकच धोशा होता की समुद्रात वाहून जाणाऱ्या कोयनेच्या पाण्याचं काय. त्यावर आपण लवकरच निर्णय घेऊ. योगेश कदम पाठपुरावा करतायत तो खेड पोयनार प्रकल्पाला आपण मंजुरी दिली आहे. २४३ कोटींचा हा प्रकल्प आहे. न्यू मांडवेच्या प्रकल्पाबाबतही माझी चर्चा झाली आहे. तो प्रकल्पही तातडीने मंजूर केला जाईल. त्याबरोबर लघु आणि मध्यम प्रकल्पांचं पुनरुज्जीवन करायला हवं. रखडलेल्या सिंचन प्रकल्पांचं पुनरुज्जीवन केलं जाईल. त्याला पैसे कमी पडू दिले जाणार नाहीत. ४३ कोटींची खेड नळपाणी योजना आपण मंजूर केली आहे. मरीन पार्क आपण मंजूर करत आहोत. कुणबी भवनासाठी २ कोटी, अल्पसंख्याक सामाजिक भवन २ कोटी याला मी मान्यता देतो. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
मदत-पुनर्वसनमधून २ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
कोकणात काजू-आंबा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी ४ वर्षांसाठी १३७५ कोटींची तरतूद केली आहे. सिंधुदुर्गात मालवण-वेंगुर्ल्यात मार्केटिंग आणि ब्रँडिंगला आपण प्रोत्साहन देतोय. चक्रीवादळ आल्यानंतर विद्युत पोल, ओव्हरहेड लाईन तुटून पडतात त्यासाठी मदत-पुनर्वसनमधून २ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मच्छिमार बांधवांना दिलासा देण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. काही देश पर्यटनावर चालतात. ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांचं काम प्रलंबित आहे, तिथे मे पर्यंत एक लाईन आणि संपूर्ण रस्ता डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
तुम्हा आम्हाला गद्दार म्हणता? खोके म्हणता? मी कधीही आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही.
१९च्या निवडणुकीवेळी कोविड नव्हता. माझी आई रुग्णालयात उपचार घेत होती. मी पालघरला राजेंद्र गावितांच्या प्रचारासाठी निघालो होतो. मला डॉक्टरचा फोन आला. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. गावित मला म्हणाले की माझी सगळी तयारी झाली आहे. सभेला जाणं आवश्यक आहे. मी डॉक्टरला सांगितलं की संध्याकाळी येतो. आई जवळपास गेली होती. पण मी राजेंद्र गावितांची सभा सोडून आलो नाही. त्याची सभा पूर्ण करून रुग्णालयात पोहोचलो. असं काम केलं. हा आमचा गन्हा आहे? ते कर्तव्य पार पाडलं, हा आमचा गुन्हा आहे? कोविडमध्ये पीपीई किट घालून रुग्णालयात गेलो हा आमचा गुन्हा आहे? घरात बसून आदेश देण्याचं काम आम्ही केलं नाही. रस्त्यावर उतरून लोकांना मदत केली. या एकनाथ शिंदेला दोनदा करोना झाला. पण हा एकनाथ शिंदे मागे हटला नाही. तुम्हा आम्हाला गद्दार म्हणता? खोके म्हणता? मी कधीही आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही. असे देखील भाषणाच्या शेवटी शिंदे म्हणाले.