...त्यापेक्षा हे सरकारच अदानींच्या ताब्यात देऊन टाका; अंबादास दानवे संतापले
मुंबई : काहीच दिवसांपुर्वी राज्य आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली आहे. या समितीत गौतम अदानी यांचे पुत्र करण अदानींचा समावेश आहे. यावरुन आता विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधाला आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी अदानींसाठी सरकार चालवण्यापेक्षा हे राज्य सरकार त्यांच्याच ताब्यात देऊन टाका, या शब्दात राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
अब्जाधिश गौतम अदानी आणि अदानी समूहाची चहूबाजूला चर्चा रंगली आहे. अमेरिकेतील संशोधन कंपनी, हिंडेनबर्गने आपला खळबळजनक अहवाल प्रकाशित केला आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर भाजप सरकारवर टीका करण्यात येत आहे. तर, कॉंग्रेसनेही आज राज्यभरात आंदोनले केली. अशातच, अंबादास दानवे यांनी ट्विट करत राज्य आर्थिक सल्लागार परिषदेत गौतम अदानी यांचे पुत्राचा समावेश निदर्शनास आणले आहे. तसेच, यावरुन शिंदे-फडणवीसांवर टीकाही केली आहे.
अशा अदानींसाठी सरकार चालवण्यापेक्षा हे राज्य सरकार त्यांच्याच ताब्यात देऊन टाका! कशाला ते तरी चालवता. आर्थिक परिषदेच्या सदस्य यादीत अदानी ग्रुपचे करण अदानी यांचा समावेश करून हे सरकार कोणासाठी काम करते, हे स्पष्ट झाले. हे महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराच दानवेंनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.
दरम्यान, राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरपर्यंत विकसित करण्यासाठी राज्य आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली होती. या परिषदेच्या अध्यक्षपदी एन.चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, अर्धवेळ सदस्य म्हणून 17 जणांची निवड करण्यात आली आहे. यात मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि गौतम अदानी यांचे पुत्र करण अदानींचा समावेश केला आहे. विशेष आर्थिक क्षेत्रातून करण अदानींचा समावेश या समितीत करण्यात आला आहे.