भाजप प्रवक्त्यावर खासदार कोल्हे संतापले; म्हणाले, 'आता खूप झालं बोलायची वेळ आली'
राज्यात सध्या राजकीय मंडळींकडून एका पाठोपाठ वादग्रस्त विधानांचे सत्र सुरु असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्यात एकच त्या विधानावर टीका केली जात आहे. अशातच राज्यसभा खासदार आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्या विरोधात अवघ्या महाराष्ट्रातून टीका होत आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. यावरूनच आता राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हे यांनी एका व्हिडिओ मार्फत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
अमोल कोल्हे संताप व्यक्त करत म्हटले की, सुधांशु त्रिवेदी यांचे वक्तव्य ऐकलं, आणि मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. नेमकं खुपतंय काय यांना? कधी भाजपाचे प्रवक्ते बोलतात, तर कधी महामहिम राज्यपाल बोलतात? वारंवार ही बेताल वक्तव्य महाराजांबद्दल का केली जातात? 'भाजपला शिवरायांबद्दल नेमकं खुपतं तरी काय? धर्मसत्ता ही राज्यसत्तेपेक्षा वरचढ असू नये. धर्म सत्ता राज्यसत्ता एकत्र येऊन लोकांचे कल्याण करावे. 'माणूस हा धर्मासाठी नसून धर्म हा माणसासाठी आहे, हे शिवरायांनी हे वास्तव अधोरेखित केलं ते तुम्हाला खुपतंय? शिवरायाने अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र आणलं हे तुम्हला खुपतंय? ज्या शिवरायांच्या गनिमा काव्याचे आदर्श संपूर्ण जग घेतो हे जर तुम्हला समजत नसेल तर शिवरायांच्या इतिहास माहिती नसेल तर काही पुस्तक पाठवतो. असे अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, शिवराय जेव्हा भले भले राजे औरंगजेबच्या दरबारात माना खाली घालून उभे राहत होते. तेव्हा फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते जे औरंगजेबच्या डोळ्यात डोळे घालून या हिंदुस्थांनाच्या मातीला स्वाभिमान काय असते ते शिकवले होते. आणि त्या महाराज्यांबद्दल तुम्ही असे वक्तव्य करता. छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच देव नाही पण देवांपेक्षा कमीही नाही. आमची अस्मिता होते आहे आणि यापुढेही राहतील. त्यामुळे त्रिवेदी यांनी भूमिका स्पष्ट करून संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी. असे खासदार अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.