रिफायनरी विरोधक राष्ट्रवादीच्या दरबारी! शरद पवारांनी थेट लावला मुख्यमंत्र्यांना फोन, काय झाली चर्चा?

रिफायनरी विरोधक राष्ट्रवादीच्या दरबारी! शरद पवारांनी थेट लावला मुख्यमंत्र्यांना फोन, काय झाली चर्चा?

रिफायनरी विरोधी नेते सत्यजीत चव्हाण यांनी शिष्टमंडळासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.

मुंबई : रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात वातावरण चांगलेच तापले असून आंदोलक आक्रमक होताना दिसत आहे. अशात, रिफायनरी विरोधी नेते सत्यजीत चव्हाण यांनी शिष्टमंडळासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण हॉलमध्ये दोघांमध्ये दीड तास बैठक झाली. यादरम्यान, शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन लावून संवाद साधला.

रिफायनरी विरोधक राष्ट्रवादीच्या दरबारी! शरद पवारांनी थेट लावला मुख्यमंत्र्यांना फोन, काय झाली चर्चा?
लोकशाहीमध्ये ‘मन की बात’ नाही तर ‘जनता की बात’ करावी लागते : नाना पटोले

सत्यजित चव्हाण यांनी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण हॉलमध्ये शरद पवारांची भेट घेतली. या बैठकीत सत्यजित चव्हाण यांनी सरकार कशाप्रकारे दडपशाही करून अत्याचार करत आहेत आणि हा प्रकल्प आपल्यावर लादत असल्याची सविस्तर माहिती दिली. यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी फोनवरून वीस मिनिटे चर्चा केली. सरकार लवकरच शेतकरी यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवार यांना सांगितले. जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून शरद पवार यांची रिफायनरी विरोधकांनी भेट घेतली. यावेळी रिफायनरी विरोधक नेते सत्यजित चव्हाण, वैभव कोळवणकर आदीसह शिष्टमंडळ उपस्थित होते.

दरम्यान, दोन दिवसांपुर्वी रिफानरी आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आले होते. यादरम्यान, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या होत्या. यामध्ये काही स्थानिक जखमी झाल्याचेही समोर आले होते. यावरुन राजकीय वर्तुळातून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती. यानंतर सरकारने चर्चेला येण्याचे आवाहन आंदोलकांना केले होते. अशात, रिफायनरी विरोधातील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. जर तीन दिवसांत माती परीक्षण थांबले नाही तर पुन्हा आंदोलन पुकारण्याचा इशारा सरकारला देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com