मोठी बातमी! आशिष देशमुखांची काँग्रेसमधून हकालपट्टी
नागपूर : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात वक्तव्य करणे काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांना चांगलेच महागात पडले आहे. आशिष देशमुख यांना कॉंग्रेस पक्षातून हकलपट्टी करण्यात आलं आहे. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत आदेश दिले आहेत. सहा वर्षांसाठी देशमुखांना पक्षातून निलंबित केलं आहे. याबाबतचे एक पत्रही समोर आले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने ५ मार्च २०२३ रोजीच्या पाठविलेल्या कारणे दाखवा नोटीसला ९ एप्रिल २०२३ रोजीच्या आपल्यामार्फत मिळालेल्या उत्तरावर समितीने चर्चा केली आहे. आपण आपल्या पक्षविरोधी वर्तनाबद्दल व जाहीर वक्तव्याबद्दल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्वे या प्रकरणात लागू होतात.
आपण केलेल्या पक्षविरोधो वक्तव्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने तुम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांच्या कालावधीसाठी निष्कासन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशाद्वारे पक्षविरोधी कारवायांकरीता आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथिमक सदस्यत्वावरुन पुढील सहा वर्षाकरिता तात्काळ निष्कासित करण्यात येत आहे, असे शिस्तपालन समितीच्या पत्रात लिहीले आहे.
दरम्यान, मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आशिष देशमुख यांची त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी भेट घेतली होती. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून आगामी निवडणूक आशिष देशमुख भाजपच्या तिकीटावर लढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, आज तरी मी पक्ष बदलण्याचा प्रश्न उद्भवत नाही. फक्त नाश्ता करण्यासाठी फडणवीस आणि बावनकुळे आले असल्याचे स्पष्टीकरण आशिष देशमुखांनी दिले होते.