'राज्यपाल हटाओ महाराष्ट्र बचाओ' औरंगाबादेत मनसेचे लक्षवेधी आंदोलन
काल राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादेत बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा भाषणात एकेरी उल्लेख करत वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यावर एकच राजकीय वर्तुळात खळबळ माजली. अनेक राजकीय मंडळींची यावर प्रतिक्रिया येत असताना. आज मनसेकडून राज्यपालांच्या विरोधात औरंगाबादेत आंदोलन करण्यात आले. यावेळी 'राज्यपाल हटाओ महाराष्ट्र बचाओ' असे फलक सुद्धा कार्यकर्त्यांकडून दाखवण्यात आले.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा काल भाषणात एकेरी उल्लेख केला. राज्यपाल यांनी त्याचप्रमाणे महाराजांची तुलना देखील चुकीच्या पद्धतीने केली. महाराज हे आमचे देव आहेत, त्यांचे रक्त आमच्या नसानसात भिनलेले आहे. त्यामुळे त्यांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही.
राज्यपालांचे आता वय झाले आहे, म्हणून ते अशा प्रकारची बेताल विधानं करत आहेत, त्यांना परत पाठवा, अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरात निदर्शने करण्यात आली. राज्यपालांचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने टीव्ही सेंटर चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. या आंदोलनात मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.