'माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला आणि मी औरंगाबादमध्येच मरणार' नामांतराला जलील यांचा कडाडून विरोध
केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराला अखेर मंजुरी दिली. हा प्रस्ताव अनेक दिवसांपासून केंद्र सरकारकडे प्रलंबित होता. या केंद्र सरकारच्या निर्णयाचे आता सर्वांकडून स्वागत होत आहे. तर दुसरीकडे यावरून आता श्रेयवादासह आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे. याच नामांतराविरोधात औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. त्यावरच आता पुन्हा एकदा जलील यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले इम्तियाज जलील?
नाव बदलली जातील, बोर्ड बदलतील पण इतिहास कसा बदलाल? इतिहास कधीच मिटवता येत नाही. ज्या शहरात माझा जन्म झाला ते औरंगाबाद शहर जगाच्या नकाशावर एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. काहीजण औरंगाबादचे नामांतर केल्यानंतर उड्या मारत आहेत. पण, माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला आणि मी औरंगाबादमध्येच मरणार. अस ठामपणे जलील यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, नाव बदलून शहराची परिस्थितीत बदलणार आहे का? लोकांना दररोज पाणी, चांगले रस्ते, आरोग्य, शिक्षणाच्या सुविधा मिळणार आहेत का? असे रोखठोक सवाल त्यांनी केला. त्यामुळे आमचा शहराच्या नामांतराला विरोधच राहील, असे इम्तियाज जलील यांनी दोनदा स्पष्टपणे सांगितले.