हे सरकार नामर्द! केवळ सत्तेसाठी निर्णय घेतात; कडूंचा घरचा आहेर
पुणे : केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णयाविरोधात ठिकठिकणी शेतकरी आंदोलन करत आहेत. तर, विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. अशातच, बच्चू कडू यांनीही शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला आहे. हे सरकार नामर्द आहे. केवळ सत्तेसाठी ग्राहकांचे हित जपण्याच्या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतल्याचा घणाघात बच्चू कडू यांनी केला आहे.
बच्चू कडू म्हणाले की, हे सरकार नामर्द आहे. केवळ सत्तेसाठी ग्राहकांचे हित जपण्याच्या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतल्याची आहे. कांद्याचे भाव वाढल्यानंतर सरकार हस्तक्षेप करते. मग, दर पडल्यानंतर का करत नाही, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. खाणाऱ्यांचा विचार करता पिकवणाऱ्यांचा नाही ही नालायक प्रवृत्ती असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
कांदा परवडत नसेल तर खावू नये, माझ्याकडे लसूण आहे, मुळाही आहे, अशा शेलक्या शब्दात कडू यांनी सरकारवर टीका केलीय. कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरणार आहे का? असा सवालही बच्चू कडूंनी उपस्थित केला. कांदाप्रश्नी अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार पडले म्हणून तुम्ही एवढे का घाबरता? असा सवाल करताना त्यांनी सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. तसेच 2 हजार 410 प्रतिक्विंटल या दराने कांद्याची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन दिली आहे.