ऑपरेशनमध्ये काही चुका झाल्या, तरी पेशंट वाचला हे महत्त्वाचं; बच्चू कडूंची प्रतिक्रिया
अमरावती : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. यामुळे शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. तरी न्यायालयाने तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरेही ओढले आहेत. यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ऑपरेशनमध्ये काही चुका झाल्या असल्या तरी पेशंट वाचला हे महत्त्वाचं आहे, असे बच्चू कडू यांनी म्हंटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारला दिलासा मिळाला आहे. कोणाचंही निलंबन झालं नाही. निलंबनाचा निर्णय अध्यक्षाला द्यावं लागेल. हे सरकार अध्यक्षांनीच बनवलं आहे. त्यामुळे आता वेगळा निर्णय लागणार नाही, असा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केला आहे. तर, उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंकडे आमदार व खासदारांची संख्या जास्त आहे. जो निर्णय झाला आहे तो संख्येच्या बळावर झाला आहे. त्यामुळे सरकार अधिक मजबूतीने काम करेल, असेही त्यांनी सांगितले आहे.
राज्यपालांनाचे कार्य संविधानाला अनुसरून नव्हते, असे न्यायालयाने म्हंटले आहे. कोणत्याही पक्षात अंतर्गत दुफळी निर्माण झाली असली तरी राज्यपालांनी त्या राजकीय क्षेत्रात शिरकाव करणे, हे राज्यघटनेतील तरतुदींना अभिप्रेत नाही, असे गंभीर निरीक्षण घटनापीठाने नोंदविले आहे. यावरही बच्चू कडूंनी भाष्य केले आहे. राज्यपालांचा काही चुकलं असेल मात्र ऑपरेशन मध्ये काही चुका झाल्या तरी पेशंट वाचला हे महत्त्वाचं आहे, असे बच्चू कडूंनी म्हंटले आहे.