काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर बावनकुळेंचे गंभीर आरोप; म्हणाले, काँग्रेसकडे पैसा कुठून...
सध्या देशभरात काँग्रेसची राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरु आहे. काल हाती मशाल घेऊन राहुल गांधी हे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह ही पदयात्रा घेऊन महाराष्ट्रात दाखल झाले. मात्र, आता या यात्रेचा प्रवास महाराष्ट्रात सुरु झालेला असताना दुसरीकडून आता भाजपने यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. या 'भारत जोडो' यात्रेत मागील अडीच वर्षातील सत्ताकाळात केलेल्या भ्रष्टाचाराचा पैसा वापरण्यात येत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, यात्रेत खर्च होणारा पैसा, काँग्रेसकडे पैसा कुठून आला, कोणी खर्च केला याची चौकशी उपमुख्यमंत्री आणि गृह विभाग सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी करावी. काँग्रेसच्या अधिकृत खात्यातून किती पैसे यात्रेसाठी वापरण्यात आले आहेत आणि प्रत्यक्षात किती यात्रेसाठी किती खर्च झाला, काँग्रेस नेत्यांनी जो खर्च केला आहे तो कुठून केला आहे हे या चौकशीत तपासले पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
पुढे ते म्हणाले की, 'भारत जोडो' यात्रेत लोक स्वत: हून येत नसून त्यांना आणले जात आहे. ही यात्रा नेत्यांनी हायजॅक केली आहे. ज्या जिल्ह्यातून यात्रा जाते, त्या जिल्ह्यातील नेत्यांच्या मुलांना पुढे आणले जात असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला.