काँग्रेसला स्वत:चीच माणसे सांभाळता येत नाहीत, अन् ते दुसऱ्यावर टीका करतात - बावनकुळे
राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यातच नाशिकच्या जागेबाबत मोठा पेच निर्माण झाला होता. डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्ज न भरता मुलाला अर्ज भरायला लावला. दुसरीकडे भाजपने त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही आणि तांबे यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. त्यावरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केली होती त्यावरच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसला स्वत:चीच माणसे सांभाळता येत नाहीत. त्यामुळे ते दुसऱ्यावर टीका करतात. त्यांनी प्रथम आपले घर वाचवावे. त्यांचे घर कच्चे झाले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रदेश आणि केंद्रीय नेतृत्वावर आज प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशी टीका बावनकुळे यांनी पटोलेंवर केली.
सत्यजीत तांबे यांनी अजूनही आम्हाला पाठिंबा मागितला नाही. आमच्याकडे आले तर आमच्या राज्य आणि केंद्रीय संसदीय मंडळाकडे हा विषय जाईल आणि ते निर्णय घेतील. आमच्या तीन उमेदवारांनी अर्ज भरले. मात्र त्यांना एबी फॉर्म दिले नाही, असेही बावनकुळेंनी यावेळी सांगितले.