Gopichand Padalkar | Rohit Pawar
Gopichand Padalkar | Rohit PawarTeam Lokshahi

रोहित पवार हा बिनडोक माणूस, का म्हणाले पडळकर असं?

फुले शाहू आंबेडकरांचे नाव तुम्ही घेता आणि महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण करता? खरं तर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोणताही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरु असताना, दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. याच दरम्यान, आजपासून नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. याच अधिवेशनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानभवन परिसरात ‘संघर्ष’ नावाच्या पुस्तकाचे वाटप केले. यावरूनच भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर विखारी शब्दात टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना पडळकर यांनी हे विधान केले आहे.

Gopichand Padalkar | Rohit Pawar
अधिवेशात उद्धव ठाकरेंनी गोंधळ करू नये, रवी राणा याची जहरी टीका

नेमकं काय म्हणाले पडळकर?

“रोहित पवार हा बिनडोक माणूस आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या रोहित पवारांना संघर्ष शब्दाचा अर्थतरी कळतो का? रोहित पवारांनी असा कोणता संघर्ष केला आहे, की ते ‘संघर्ष’ नावाचं पुस्तक वाटत आहेत. अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. आज हे लोकं शाहू-फुले-आंबेडकरांची पुस्तकं वाटत आहेत. मात्र, शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेण्याची पात्रता पवार कुटुंबियांची नाही. ज्या पवारांनी चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भोगलं, त्यानंतर त्यांचाच पुतण्या या राज्याचा उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री आणि अर्थमंत्री होतो आहे. त्यांचीच मुलगी परत खासदार होते, त्यांचाच नातू परत आमदार होतो, हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या कोणत्या पुस्तकात लिहिले आहे?” असंही ते म्हणाले.

“कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहूजनाच्या मुलांना शिक्षण मिळावं, यासाठी रयत शिक्षण संस्थ्येची स्थापना केली होती. प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री हा रयत शिक्षण संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष राहील, हे या संस्थेच्या घटनेत लिहिले होते. मात्र, शरद पवारांनी ही घटना बदलली. याचे नेमकं कारण काय होतं? पदाचा गैरवापर करण्यात पवार कुटुंबीय पुढे आहे, मग कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? फुले शाहू आंबेडकरांचे नाव तुम्ही घेता आणि महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण करता? खरं तर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोणताही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही”, असे देखील पडळकर यावेळी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com