महाविकास आघाडीने महाराष्ट्राला महाविनाशच्या दिशेने नेले; नड्डांचे टीकास्त्र
चंद्रपुर : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा आज चंद्रपुर दौऱ्यावर असून त्यांनी भाजप मिशन 45 सुरु केले आहे. यावेळी नड्डांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्राला महाविनाशच्या दिशेने नेले. सत्तेच्या हव्यासापायी ते इतके भरकटले की ते आपली विचारधारा विसरले. कुठे नेऊन ठेवला होता महाराष्ट्र, असा घणाघात त्यांनी केला आहे.
जेपी नड्डा म्हणाले की, मी महाराष्ट्रात अशा वेळी आलो आहे, जेव्हा येथे सरकार बदलले आहे. मध्यंतरी एक छोटा कालावधी आला ज्याने महाराष्ट्राला ‘महाविनाश’च्या दिशेने ‘महाविकास आघाडी’ नावाने नेले. परंतु, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने महाराष्ट्र पुढे जात आहे. रस्ते असो, महामार्ग असो, पायाभूत सुविधा असो, विमानतळ असो, रेल्वे स्टेशन असो, पंतप्रधान असो पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सर्वत्र विकासाची नवी गाथा लिहिली गेली आहे.
मला उद्धव ठाकरेंना विचारायचे आहे की, पालघरच्या साधू हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात काय अडथळा होता? सत्तेच्या हव्यासापायी ते इतके भरकटले की ते आपली विचारधारा विसरले. कुठे नेऊन ठेवला होता महाराष्ट्र, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
खुर्चीच्या लालसेपोटी शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. ज्यांच्या विरोधात बाळासाहेब नेहमीच लढले त्यांच्याशी उद्धव ठाकरेंनी हातमिळवणी केली. राजकारणात कोण हितचिंतक आहे आणि मगरीचे अश्रू ढाळून कोण तुमच्या हक्काचे शोषण करत आहे हे जनतेने समजून घेतले पाहिजे, अशी टीका नड्डा यांनी शिवसेनेवर केली आहे.पण, बनावट शिवसेना सोडून खऱ्या शिवसेनेने महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपसोबत पुन्हा सरकार स्थापन केले, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, याआधी नड्डांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. आम्ही जे बोललो ते आम्ही केले आहे, आम्ही जे बोलू ते करू. विकासाचे दुसरे नाव म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि विकासपुरुषाची ओळख म्हणजे नरेंद्र मोदी, असे त्यांनी म्हंटले आहे.