राज्यपालांच्या विधानावर गडकरींनी मौन सोडलं; म्हणाले, त्यांचे जीवन आमचा आदर्श...
राज्यात सध्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद मध्ये केलेल्या वादग्रस्त विधानाची चर्चा सुरु आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची शिवाजी महाराजांशी तुलना केली. यावरून संपूर्ण राज्यात यावरून प्रचंड गदारोळ सुरु आहे. शिवप्रेमीं आणि विरोधकांकडून राज्यपालांचा निषेध वर्तवण्यात येत आहे. त्यावरच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मौन सोडून त्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले गडकरी?
राज्यपालांच्या विधानावर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आपण आपल्या आई वडिलांपेक्षाही जास्त आदराने घेतो असंही त्यांनी या वादावर बोलताना सांगितले. कारण त्यांचं जीवन आमचा आदर्श आहे. ''यशवंत किर्तीवंत! वरदवंत! सामर्थ्यवंत! जाणता राजा, निश्चयाचा महामेरू! बहुत जनांसी आधारू! अखंड स्थितीचा निर्धारू! श्रीमंत योगी.'' अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत ''वेळ पडली तर आपल्या मुलाला देखील कठोर शिक्षा देणारा आमचा राजा होता," असे नितीन गडकरी म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते राज्यपाल?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.
आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.