कोल्हापूरमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये राजकारण खालच्या पातळीचे, महाडिकांचा रोख कुणाकडे?
कोल्हापूर शहरातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बास्केट ब्रिजची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून कोल्हापूर शहरात आणखी 7 उड्डाण पूल हवे आहेत. अशी मागणी केली आहे. त्याचवेळी त्यांनी नाव न घेता आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
कोल्हापूर शहराला एक चांगलं प्रवेशद्वार असावं ही माझी संकल्पना होती. बास्केट ब्रिजचं सगळं सादरीकरण गडकरी साहेबांनी बघितले, पाच मिनिटांमध्ये साहेबांनी 180 कोटी रुपये मंजूर केले. तसेच डिझाईन बास्केट ब्रिज नाव का दिले हे पण साहेबांनी विचारलं. मी सांगितलं तो पिलर लेस ब्रिज आहे आणि मुंबईमधील वरळी सी लिंकप्रमाणे असेल. आज त्याची पायाभरणी होत आहे. बास्केट ब्रिज तीन ऐवजी चार लेन करावा, अशी विनंतीही त्यांनी गडकरी यांच्याकडे केली.
पुढे ते म्हणाले की, कोल्हापूरचे राजकारण गेल्या काही वर्षांमध्ये खूप खालच्या पातळीचे झाले आहे. आमचे नेते आदरणीय महादेवराव महाडिक साहेब यांच्यामुळे मी राजकारणात आलो. त्यांची एकच शिकवण होती आपल्याला जर काय बदल करा असेल तर दुसऱ्याला नाव ठेवून चालणार नाही, तर आपण स्वतः त्या मैदानात उतरावं लागेल. आपल्याला बदल करावे लागेल. प्रामाणिकपणे लोकांची सेवा करावी लागेल, ही शिकवण महाडिक साहेबांनी दिली.
बास्केट ब्रिज पायाभरणी कार्यक्रम हा गडकरी साहेबांच्या हस्ते झाला पाहिजे आणि चंद्रकांत दादांचा आग्रह होता. 12-13 वर्षे सत्ता आपल्या विरोधकांच्या ताब्यामध्ये होती, पण या सत्तेच्या माध्यमातून कुठलाही भरीव प्रकल्प कोल्हापूरकरांना पाहिला नाही, पण जो करत असेल त्याला विरोध मात्र करतात. आता मी खासदार झालो आहे, आता कोल्हापूरची ओळख फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट म्हणून घेतली जाते. असे महाडिक यावेळी म्हणाले.