कल्याण-डोंबिवलीत भाजप-शिवसेना वाद चव्हाट्यावर; श्रीकांत शिंदे म्हणाले, राजीनामा द्यायला तयार...
कल्याण-डोंबिवलीमधील एका भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे भाजपच्या इतर नेत्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात भूमिका घेतली. हा वाद आता विकोपाला गेला आहे. त्यावरच आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी थेट खासदार पदाचा राजीनामा द्यायला तयार असल्याचं म्हटलं आहे. सोबतच डोंबिवलीमध्ये काही नेत्यांकडून स्वार्थी राजकारणाचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. त्यामुळे आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.
नेमकं काय म्हणाले श्रीकांत शिंदे?
एका व्हिडिओच्या मार्फत त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, 'भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी केलेले वक्तव्य मी पाहिले. सोशल मीडियावरही वाचले. मला वाटते उमेदवार कोण असेल ते वरिष्ठ पातळीवर ठरवले जाईल. जो योग्य उमेदवार असेल त्याला उमेदवारी दिली जाईल. पण मला एकच सांगायचंय, ही युती वेगळ्या विचाराने झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका विचाराने महाराष्ट्रात युती स्थापन केली. युती झाल्यानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. युती आल्यानंतर सरकार स्थापन केलं. सरकारच्या माध्यमातून चांगलं काम होत आहे. असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, कोणत्या तरी सिनियर पीआयवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे ठराव करतात की, शिवसेनेला सपोर्ट करायचा नाही. त्याचबरोबर कल्याण लोकसभेचा उमेदवार भाजपच ठरवणार. हे आव्हानं खूप विचारपूर्वक केली पाहिजे. आम्हाला आव्हानं देण्याचं काम या लोकांनी करु नये. कारण एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जे केलं याचाही विचार त्यांनी केला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल उचललं नसतं तर काय परिणाम झाले असते याचाही विचार झाला पाहिजे. असा देखील इशारा त्यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान म्हणून कसे निवडून येतील यासाठी काम केलं पाहिजे...
'युती जेव्हापासून आहे, गेल्या नऊ वर्षांपासून मी खासदार आहे. मला दोन वेळा नागरिकांनी निवडून दिलं आहे. तेव्हापासून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन जाण्यासाठी मी काम करतोय. निधीचा विषय असेल तर मी आताच उल्हासनगरमधील भाजप नगरसेवकांना 55 कोटी देण्याचं काम केलं. त्याचा जीआरही काढण्यात आला. काही दिवसांमध्ये टेंडर निघतील. काम चांगलं चालू असताना कुणीही युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये. सगळ्यांनी युतीसाठी काम केलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान म्हणून कसे निवडून येतील यासाठी काम केलं पाहिजे. यासाठी कोणताही स्वार्थ ठेवू नये. मलाही कोणताच स्वार्थ नाही. मला सांगितलं की, कल्याण लोकसभेचा राजीनामा द्या. तर मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि पूर्णपणे पक्षासाठी युतीचं काम करायला मी तयार आहे.' असे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितले.