विरोधक सत्ता गेल्याने बावचळले, बावनकुळेंची मिश्किल टीका
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज नंदुरबार दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जाऊन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील विरोधीपक्षावर जोरदार टीका केली आहे. सोबतच राज्यातील सरकार जसे रात्रीतून बदलले तसेच विरोधीपक्षातील काही बडे नेते रात्रीतून भाजपमध्ये आलेले दिसतील, असा खळबळजनक दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी यावेळी केला.
नेमकं काय म्हणाले बावनकुळे?
सध्याचे सरकार शिंदे-फडणवीस सरकारची बुलेट ट्रेन असून, मागचे महाविकास आघाडीचे सरकार तीनचाकी रिक्षा होती. त्यामुळे विकासाच्या फरक दिसेलच. असे बोलत त्यांनी मविआ सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘‘राज्यातले विरोधी पक्षाचे नेते सत्ता गेल्याने बावचळले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काहीच केले नसल्याने त्यांच्या आरोपांची दखल का घ्यावी? त्यांचे आरोप फक्त प्रसिद्धीसाठी आहेत. याकूब मेननच्या कबरीचे सुशोभीकरण हे उद्धव ठाकरे सरकारच्या काळातच झाल्याने त्यांनी जनतेची माफी मागावी.’’ असे विधान त्यांनी यावेळी केले.
नंदुरबार जिल्ह्यातील भाजप व शिंदे गट एकत्र निवडणूक लढणार
नंदुरबार पालिकेसह जिल्ह्यातील सर्व पालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच आगामी सर्व निवडणुकांबाबत नंदुरबार जिल्ह्यातील भाजप व शिंदे गटात गेलेले नेते यांच्याशी चर्चा करून समन्वयाने याबाबत निर्णय घेण्यात येईल. सर्व मतभेद मिटवून एकत्र निवडणुका लढविल्या जातील, असेही यावेळी बावनकुळे यांनी सांगितले.