'बारामतीचा विकास केला म्हणजे जनतेवर उपकार नाही केले'
प्रशांत जव्हेरी | नंदुरबार : तुम्ही बारामतीचा विकास केला असेल तर जनतेवर उपकार केलेले नाही, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर केली आहे. पुढील लोकसभेत बारामती मध्ये परिवर्तन घडणार, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. ते आज नंदुरबार दौऱ्यावर असून पत्रकार परिषदेत बोलत होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या नेत्यांना धसका घेण्याची गरज नाही. जर तुम्ही बारामतीच्या विकास केला असेल तर जनतेवर उपकार केलेला नाही. येणारी वेळ जनता ठरवेल की बारामतीत परिवर्तन करायचे. राष्ट्रवादीचे नेत्यांवर आम्ही काय वैयक्तिक टीका केली नाही त्यांनी हा धसका घेतलेला आहे म्हणून ते पुन्हा पुन्हा बारामतीचा प्रश्न उपस्थित करत आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले आहे.
तर, धुळे जिल्हा दौऱ्यावर असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकही कार्यकर्ता निवडणूक लढण्यासाठी मिळाला नाही पाहिजे. इतके पक्ष प्रवेश करून घेण्याचे आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केले होते. भाजपत आता नेत्यांची गरज नाही, प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांनी 25 पक्ष प्रवेशाचा निर्धार करण्याचेही आवाहन बावनकुळे यांनी केले.
दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मुंबई दौरा करत आगामी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले आहे. यानंतर भाजपने मिशन मुंबई आणि बारामतीची जय्यत तयारी सुरु केली आहे. यासाठी भाजपच्या बडे नेते बारामतीत हजेरी लावणार आहेत.