विश्वासघात, बेईमानी...त्या सेनेची किंचित सेना करू; बावनकुळेंचा घणाघात
मुंबई : भारतीय जनता पक्षाचा उद्या स्थापना दिवस आहे. या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय भाजप कार्यालयातून राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी रुपरेषा दिली आहे. विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पंतप्रधानांच्या भाषणानंतर बुथस्तरावर कार्यक्रम घेतले जातील. ९७ हजार बूथपैकी प्रत्येक बूथवर किमान १० ते २५ कार्यकर्त्यांचा प्रवेश करावा, अशी योजना असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. तसेच, हिंदुत्ववादी विचारापासून जे दूर गेलेत त्या सेनेची किंचित सेना करू, असा निशाणाही त्यांनी यावेळी साधला.
पुढील काळात निवडणुका येणार आहेत. मविआने गैरसमज तयार केला आहे. तो गैरसमज दूर करून माणसे जोडण्यासाठी ही योजना तयार केली आहे. जनतेचा कौल सर्वांना मान्य असतो. पण आम्ही ३ कोटी लोकापर्यंत पोहचणार आहोत. प्रत्येक मंगळवारी पक्षप्रवेश दिसणार आहे. २०२४ पर्यंत संकल्प करत आहोत. जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडणार असल्याचा निर्धार केला आहे. जेवढे मैदानात येथील त्यांना निपटण्यासाठी मैदानात जाणार आहोत. आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत. आता अमित शहा म्हणालेत ४८ जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटले आहे.
पाच वर्षे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे सर्वात जास्त लाड पुरवले. तुम्हाला त्यांनी भावासारखे मानले आता तुम्ही त्यांच्यावर बोलता. कार्यकर्त्यांची देखील कामे बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंची कामे देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. तुम्ही फक्त विश्वासघात व बेईमानी केली. विश्वासघात करणाऱ्या लोकांना युतीत स्थान नाही. जे हिंदुत्ववादी विचारापासून दूर गेलेत त्या सेनेची किंचित सेना करू, अशी टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी सकाळचा भोंगा बंद करावा, असे आवाहन मी केले होते. विरोधकांनी विकासकामांवर, शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नांवर बोलावे. सकाळचा भोगा बंद झाला तर राजकीय वातावरण खराब होणार नाही. विरोधकांनी विकासाचा अजेंडा घेऊन या. जनतेसाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन राज्यसाठी काम केले पाहिजे. महाराष्ट्र राजकीय, सांस्कृतिक वातावरण बिघडू नका, असे आवाहन त्यांनी केले.