फडणवीसांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हातून चूक घडली; बावनकुळेंचे विधान चर्चेत
कल्पना नळसकर | नागपूर : मराठा आरक्षणप्रश्नी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या आमदार व खासदार यांच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरे यांना शिंदे-फडणवीस यांचा राजीनामा मागण्याचा अधिकारच नाही. मराठ्यांचा आरक्षण जाण्याचा खरा दोषी कोण? तर तो उद्धव ठाकरे सरकार आहे. उलट उद्धव ठाकरे यांनीच मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे, असे बावनकुळेंनी म्हंटले आहे.
उद्धव ठाकरे सरकारने केलेला पाप झाकण्यासाठी उबाठा गटाला या पद्धतीचे निवेदन करावे लागत आहे. राज्यपालांकडे जाण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयात मांडला गेला नाही. त्यासाठी योग्य वकील लावले नाही. सर्वोच्च न्यायालयाने अनेक तारखा देऊनही उद्धव ठाकरे सरकार जागं झालं नाही. शरद पवार हे तेव्हा महाविकास आघाडीचे नेते होते. त्यांनीही उद्धव ठाकरे सरकारला या संदर्भात सांगितले नाही. उलट देवेंद्र फडणवीस सरकारने उच्च न्यायालयात आरक्षण टिकवले होते. फडणवीस यांनी माफी मागितली, त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हातून चूक घडली आहे, हे मान्य करून त्यांनी माफी मागितली, असे चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हंटले आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वागण्यामुळे तुटली आहे. मूळ शिवसैनिकांना मातोश्रीवर, विधान मंडळात, मुख्यमंत्री कार्यालयात प्रवेश नव्हता. ते कधी आमदारांचे काम करत नव्हते. त्यामुळे शिवसेना आमदारांना आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहिल्यामुळे पराभूत होऊ असे वाटले म्हणून शिवसेनेचे आमदार सोडून आले. त्यामुळे गजानन कीर्तीकर खरेच बोलले आहे.
भाजपचा मराठा आरक्षणाच्या मागणीला पूर्ण पाठिंबा आहे. फडणवीस सरकारनेच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा काम केला होता. अनेक प्रकारच्या सवलती दिल्या होत्या. त्यासाठी सरकारने आर्थिक तरतूद केली होती. जसं आरक्षण फडणवीस सरकारने मराठ्यांना दिला होता. तशाच पद्धतीचा आरक्षण मराठा समाजाला पुन्हा देण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार करत आहे. त्यामुळे आंदोलन करणाऱ्यांनी हे समजून घ्यावं. ज्या नेत्यांनी अनेक वर्ष सत्ता सांभाळूनही मराठा समाजासाठी काहीही केले नाही, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. सर्व मराठा समाजाच्या संघटनांनी सरकार सोबत येऊन सरकारसोबत चर्चा करावी आणि यातून मार्ग काढावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शरद पवारांनी त्यांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेच्या कार्यकाळात मराठा समाजाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक मागासलेपणाबद्दल अहवाल तयार केला नाही. 40-40 वर्षे सत्ता उपभोगूनही समाज मोठा झाला नाही. आता चौकशी समिती गठित केली आहे. त्याच्यातून सत्य समोर येईल लाठीमार च्या मागे कोण, आंदोलनाच्या मागे कोण. हे सरकार विधान मंडळात सांगणारच आहे, असेही बावनकुळेंनी म्हंटले आहे.