उध्दव ठाकरेंमध्ये धमक असेल तर...; बावनकुळेंचे आव्हान
प्रशांत जव्हेरी | नंदुरबार : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सामनातील टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना थेट महाविकास आघाडी सोडण्याचा आव्हान त्यांनी दिले. गुजरात विधानसभेच्या प्रचारासाठी बावनकुळे यांनी नंदुरबार भाजपा कार्यालयाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
भारतीय जनता पक्ष सावरकरांच्या अपमानाविरुद्ध रस्त्यावर उतरला. सावरकरप्रेमाचे हे ढोंगच म्हणावे लागेल, अशी टीका सामना रोखठोकमधून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंना जे बोलायचं असतं ते सामानातून लिहिलं जात असतं. उद्धव ठाकरे काँग्रेसधर्जिने झाले असून त्यांच्यात आणि त्यांच्या टीममध्ये धमक असेल तर त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, असे आव्हान बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
तसेच, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्यावरुन विरोधकांकडून भाजपला लक्ष्य करण्यात येत आहे. याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आम्हा सर्वांना आदर्श आणि वंदनीय आहेत. त्यामुळे राज्यपाल कोणत्या अर्थाने बोलले हे आम्हाला माहित नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
भारत जोडो यात्रेत बुलढाणा येथील सभेत शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहत असताना फटाके फोडण्यात आल्याने राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला होता. भारत जोडो यात्रेत फटाके फोडणारे काँग्रेसचे अतिउत्साही कार्यकर्ते होते. त्यांनीच फटाके फोडले असतील. अज्ञात व्यक्ती त्यांच्या कार्यक्रमात कशाला जातील, असा प्रश्न बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, राज्यपालांच्या वक्तव्यावर शिवसेना आक्रमक झाली असून संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यपालांना हटविण्याची मागणी केली पाहिजे, नाहीतर जोडे काय असतात. आणि कसे मारले जातात हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे राऊतांनी म्हंटले आहे.