फडणवीसांवर केलेल्या शरद पवारांच्या 'त्या' टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, पद सोडतील, पण...
काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यमान विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यासोबत झालेल्या पहाटेच्या त्या शपथविधीबाबत खळबळजनक विधान केले. त्यानंतर त्याच्या या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात त्यामुळे एकच गदारोळ निर्माण झाला आहे. पवार साहेबांशी चर्चा करूनच आम्ही सरकार स्थापन केले, असे फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष यांनी तो दावा फेटाळला आणि असत्याचा आधार घेऊन ते राजकारण करतील, असे वाटले नव्हते, असे पवार म्हणाले. त्यावरच आता भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, या विषयी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. त्यावर मी बोलणं योग्य नाही. येवढ्या वर्षांपासून मी फडणवीस यांना ओळखतो, असत्य बोलून राजकारण करणारे ते नाहीत. वेळप्रसंगी पद सोडतील, पण खोटं बोलून ते राजकारण करणार नाहीत आणि स्वयंसेवक म्हणून ते कधीही चुकीचा मार्ग निवडणार नाही. असे प्रत्युत्तर त्यांनी यावेळी दिले.
पुढे बोलताना त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला ते म्हणाले की, संजय राऊत यांच्यावर महाराष्ट्राने विश्वास ठेवणे बंद केले आहे. जेलमध्ये गेले तेव्हापासून ते शिवराळ भाषेत बोलतात. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलावं, इतकी उंची राऊत यांची नाही. षड्यंत्रात संजय राऊत असतील. कदाचित हे अनेक दिवसांचं प्लॅनिंगही असेल आणि त्या टीममध्ये संजय राऊत यांच्यासोबत उद्धव ठाकरे असतील. महाविकास आघाडी सरकार निसर्गाने पाडलं. परमेश्वराने या प्रकरणात महाराष्ट्राच्या जनतेला न्याय दिला, असे आमदार बावनकुळे म्हणाले.