हिंमत असेल तर...; छगन भुजबळ यांचं जरांगेंना आव्हान
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांची सगे-सोयऱ्यांची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. याविरोधात आता ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. तर, छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जरांगे यांच्या एवढे ज्ञानी दुसरे कुणीच नाही, त्यांच्यामध्ये जर हिम्मत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला आव्हान द्यावं, असे खुले आव्हानच छगन भुजबळ यांनी दिले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, झूंडशाहीच्या पुढे नमते घेतले जात आहेत. ते मराठा जातीसाठी लढत आहेत. तर, मी संपूर्ण समाजासाठी लढतोस. मी सगळ्या ओबीसींसाठी लढतोय. सगळे मंत्री, सचिव तयार होतील ताबडतोब जातील. जीआर सुद्धा काढतील. परंतु, आम्ही आमच्या कार्यक्रमानुसार जात आहोत. आम्ही तो आखला आहे. मागच्या दाराने लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे. माझा अजेंडा फक्त ओबीसी बचाव असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
गावागावात गेले तीन दिवस उन्माद उत्सव सुरू झाला आहे. ओबीसींच्या घरासमोर फटाके लावायचे नाचायचे. लोकांना गावे सोडून जावे लागत आहे. ही भयंकर परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. धनगरांचा मुद्दा उच्च न्यायालयात आहे. ते सध्या आमच्यात आहेत. त्यांचे हे आरक्षण वाचले पाहिजे, असेही भुजबळांनी म्हंटले आहे.