Eknath Shinde | Uddhav Thackeray
Eknath Shinde | Uddhav ThackerayTeam Lokshahi

'मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांनी कधीही विचारांशी तडजोड केली नाही' मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोमणा

बाळासाहेब रिमोट कंट्रोल चालवायचे, पण ते दुसऱ्यासाठी, स्वत:ला काही पाहिजे म्हणून त्यांनी कधीही रिमोट कंट्रोल चालवला नाही. असं एकनाथ शिंदे म्हणाले.
Published by :
Sagar Pradhan

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली जात आहे. मात्र, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात जयंतीवरून चांगलीच जुंपलेली दिसली. त्यातच जयंतीनिमित्त आज मुंबईत षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. तर दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकारने विधी मंडळात बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे अनावरण झाले. याच कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला तर सोबतच उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला लगावला.

Eknath Shinde | Uddhav Thackeray
'हे ४० दगड बुडून गाळात गेल्याशिवाय राहणार नाही' शिंदे गटावर राऊतांचा घणाघात

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

बाळासाहेबांचे विचार ऐकताना आजही उर्जा मिळते, प्रेरणा मिळते. एकदा शब्द दिला की तो फिरवायचा नाही ही बाळासाहेबांची शिकवण, आम्ही ती पाळली. बाळासाहेब आमचे कुटुंब प्रमुख आणि गुरुही होते. आज आनंद दिघे असते तर त्यांना अभिमान वाटला असता. बाळासाहेबांनी आदेश द्यायचा आणि ठाण्यात त्याचं पालन व्हायचं. ठाणं आणि शिवसेना हे नातंच वेगळं होतं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वयाच्या 16 व्या वर्षापासून मी बाळासाहेबांसोबत काम केलं, त्यांची भाषणं ऐकली. आज त्यांच्या विचाराचं सरकार स्थापन केलं. आज मी मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचं तैलचित्र लावण्यात येतंय हा दुर्मिळ क्षण आहे. एकेकाळी महाराष्ट्रात प्रस्थापितांची सत्ता होती, बाळासाहेबांनी सर्वसामान्यांपर्यंत ही सत्ता पोहोचवण्याचं काम केलं. कुणालाही राजकीय पार्श्वभूमी नसताना, बाळासाहेबांनी त्यांना आमदार, खासदार आणि मंत्री केलं. एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबातला मुलगा आज राज्याचा मुख्यमंत्री आहे, ही जादू फक्त बाळासाहेबांचीच आहे.

सत्तेसाठी बाळासाहेबांनी कधीही तडजोड केली नाही, मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी कधीही विचारांशी तडजोड केली नाही, आज त्यांचाच विचार ऐकून आम्ही काम करतोय. बाळासाहेब रिमोट कंट्रोल चालवायचे, पण ते दुसऱ्यासाठी, स्वत:ला काही पाहिजे म्हणून त्यांनी कधीही रिमोट कंट्रोल चालवला नाही. असं एकनाथ शिंदे म्हणाले. मी सूर्याचा भक्त आहे, सूर्य ज्यावेळी आकाशात उगवतो त्यावेळी सगळीकडे भगवा रंग पसरतो, तोच आता जगात पसरल्याचं पाहायचं आहे असं बाळासाहेब म्हणायचे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. बाळासाहेब मुस्लिमांच्या विरोधात नव्हते, पण देशात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांना मात्र त्यांनी सोडलं नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com