उद्धव ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, रोजचा थयथयाट सुरु...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना नाव आणि पक्ष गेल्यानंतर आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची खेड येथे जाहीर सभा पार पडली. यासभेत उद्धव ठाकरेंनी शिवसेनासह भाजपवर जोरदार निशाणा साधत टीका केली. याच उद्धव ठाकरेंच्या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय दिले एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना प्रत्युत्तर?
उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, 'आता त्यांचा रोजचा थयथयाट सुरु आहे. त्यांनी फक्त जागा बदलेली आहे. त्यांना आरोप-प्रत्यारोप केल्याशिवाय दिवस जात नाही. त्याशिवाय त्यांना चैनही पडत नाही. त्यामुळे त्यांनी आरोप करावेत, आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ. असे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले. खेडमध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ढेकणाची उपमा दिली होती. त्याबाबत माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारले असता त्यावर ते म्हणाले की, उद्या नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना देशभक्ताची उपमा देऊ नये, एवढंच मला सांगाव वाटते. तेही असं करायला मागे-पुढे पाहणार नाहीत. कारण महाराष्ट्रात जो बदल घडलाय, केंद्र आणि राज्य सरकारडून विकासाची जी कामे सुरु आहेत त्यामुळे अतिशय पोटदुखी सुरु झालेली आहे. त्याचाही इलाज आम्ही बाळासाहेब ठाकरे दवाखान्यामध्ये ठेवलेला आहे. असा टोला त्यांनी यावेळी ठाकरेंना लगावला.
पुढे ते म्हणाले की, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेतो आहेत. आमचे काम पाहून विरोधकांच्या छातीत धडकी भरलेली आहे. कसब्यातील पोटनिवडणुकीचा एका विजयाने ते एवढे हुरळून गेले आहेत की त्यांना वाटते की आता राज्य आणि देशामध्ये बदल घडेल. पण त्याचबरोबर तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष जिंकला हे त्यांना दिसत नाही. यापूर्वीदेखील बदलाचे वारे वाहून गेले असा अंदाज व्यक्त केला. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागा महायुतीला विजय मिळेल आणि सर्व विरोधकांचा धुव्वा उडेल. असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.