भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना अमित देशमुखांचा पुर्णविराम; म्हणाले, देशमुख वाडा...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. राजकीय वर्तुळात रोज कुठल्या ना कुठल्या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी होत असताना दिसत आहे. अशातच कॉंग्रेस नेते माजी मंत्री अमित देशमुख हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधान आले होते. याच चर्चांवर आता अमित देशमुख यांनी भाष्य करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
काय म्हणाले अमित देशमुख?
विटा येथील नेचर केअर फर्टिलायझर्सचे संस्थापक, जयंत वामन तथा बाबा बर्वे यांच्या कृषी क्षेत्रातील अनमोल कामगिरीबद्दल आयोजित कृतज्ञता सोहळ्यात बोलत असताना अमित देशमुख म्हणाले की, सध्या राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आहे, किंवा तसे तूर्त तरी म्हणावे लागत आहे. हे सरकार वैध की अवैध हे सर्वोच्य न्यायालयात सुनावणीसाठी प्रलंबित आहे. आता कोर्ट सुरू होणार आहे. आताची पाच वर्षे ही चमत्कारिकच राहिली. सध्या राज्यात तिसरे सरकार सुरु आहे. पहिले सरकार हे अडीच दिवसाचे होते. दुसरे सरकार हे अडीच वर्षाचे तर तिसरे सरकार हे सध्या सुरु आहे. चौथे सरकार कधीही येऊ शकेल, काहीही सांगता येत नाही, असे देखील देशमुख यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये चांगलं काम सुरु झाले होते. आताच्या सरकारला नाव ठेवायचं तरी काय? मुख्यमंत्री हे आपले आहेत आणि उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत, असा टोला त्यांनी लगावला. सध्या कोण कुठल्या पक्षात आहे हे तुम्हाला कळतं का? हा आम्हाला प्रश्न पडला आहे. असा सवाल देखील अमित देशमुख यांनी यावेळी उपस्थित केला.