शिवानी वडेट्टीवारांनी केलेल्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावर पटोलेंचे भाष्य; म्हणाले, '...तर माफी मागायला लावू'
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दलच्या केलेल्या वादग्रस्त विधानावरून सध्या प्रचंड वाद सुरू आहे. यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू असताना आता काँग्रेस नेते विजय विडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावरच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नाना पटोलेंनी शिवानी वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. ते उत्तम लेखक आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी या गोष्टी लिहून ठेवल्या असतील आणि त्यातीलच एका वाक्य उचलून शिवानी वडेट्टीवारांनी मांडलं असेल तर त्याला विरोध करायचं कारण नाही. परंतु, समजा सावरकरांनी लिहिलं नसेल आणि शिवानी वडेट्टीवारांनी ते मांडलं असेल तर निश्चितपणे त्यांना माफी मागायला लावू, असे पटोले यावेळी म्हणाले.
नेमकं काय म्हणाल्या होत्या शिवानी वडेट्टीवार?
हे लोक फुले, शाहू, आंबेडकरांचा विचारांचा कधीच मोर्चा काढणार नाही. कुठला मोर्चा काढतात? सावरकर मोर्चा काढतात. सावरकर मोर्चा काढून काय करतात. सावरकर मला आणि माझ्यासोबत महिला, भगिनी उपस्थित आहेत. सर्वांना भीती वाटत असेल कारण की सावरकरांचे विचार होते. सावकर म्हणायचे, की बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. हा तुम्ही आपला राजकीय विरोधकांविरुध्द वापरलं पाहिजे. मग, माझ्या सारख्या इथे उपस्थित महिला-भगिनींना कसं सुरक्षित वाटेल. आणि अशा लोकांचा प्रचार करत हे लोक रॅली काढतात, असे विधान शिवानी वडेट्टीवार यांनी केले होते.