'मोदी हैं तो मुमकिन हैं' अजित पवार मुख्यमंत्री होण्यावरून नाना पटोलेंची प्रतिक्रिया
उदय चक्रधर | भंडारा: राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरू आहे. त्यातच दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी राज्यातील राजकीय वातावरण काही दिवसांपूर्वी ढवळून निघाले. यानंतर एका मुलाखतीत अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपदाची त्यांच्या इच्छा उघड बोलून दाखवली. दरम्यान यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले नाना पटोले?
माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, मुमकिन हैं क्या नमकिन हैं आमचं देणं घेणं नाही. पुढच्या काळात यांचा सुपडा साफ झाला पाहिजे, तेव्हाच यांच्या सत्तेचा मस्ती आटोक्यात येईल, असं आता महाराष्ट्रातील जनतेला वाटू लागलं असल्याची खरमरीत प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. मोदी हैं तो मुमकिन हैं....! क्या अजित पवार मुख्यमंत्री बन सकते हैं!!! या प्रश्नांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अगदी खरमरीत प्रतिक्रिया देताना, आमचं याच्याशी काही देणं घेणं नाही. कारण महाराष्ट्रात जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत. शेतकरी, तरुण मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. महागाई मोठ्या प्रमाणत वाढत चाललेली आहे. हे महत्वाचे प्रश्न आहे. जनतेचे प्रश्न घेवून लढायच की खोक्यांच सरकार बनवायचं की, तानाशाहांचं सरकार बनवायचं... सत्तेचा माज राज्यात पाहायला मिळतं. चुकून पहिल्यांदा 105 भाजपचे आमदार निवडून पाठवले असं आता राज्यातील जनतेला वाटत असल्याचं पटोले म्हणाले.
पुढे पटोले यांनी बारसू रिफायनरीबाबत देखील भाष्य केले. ते म्हणाले की, बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत फडणवीस स्वतःचं राजकारण करीत असून महाराष्ट्राच्या विधानसभेत जेव्हा पत्रकाराच्या हत्येप्रकरणी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळेसच आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता. तुम्ही कोणत्याही योजना आणताना त्या भागात तुमचे बगलबच्चे जागा घेतात. आणि त्या बगलबच्च्यांना योजना दिल्या जातात. आमची भुमिका प्रकल्पाच्याविरोधात नसून सरकारने स्थानिक लोकांची आणि विरोधकांची भुमिका समाजून घेतली पाहीजे असा पलटवार नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसावर केला.