राज्यपालांचे पुन्हा वादग्रस्त विधान; म्हणाले, दोन वेगळ्या विचारांचे लोक एकत्र...
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज पुणे दौऱ्यावर होते. राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बालाजी तांबे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. राज्यपाल त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. या कार्यक्रमाला सुनिल तटकरेही उपस्थित होते. यावेळी तटकरे म्हणाले, स्वर्गीय बालाजी तांबे यांच्या आयुर्वेदाच्या उपचारामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकत्र आले, असे वक्तव्य माजी मंत्री सुनील तटकरे यांनी केले. तटकरेंच्या या विधानाचा संदर्भ घेत राज्यपालांनी कोपरखळी मारत दोन वेगळ्या विचाराचे व्यक्ती एकत्र आले अन् आघाडी बनवली, असा टोला लगावला आहे.
राज्यपाल गांधींबद्दल काय म्हणाले होते ?
पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हुतात्मा राजगुरू यांच्या 114व्या जयंती सोहळ्यात ते म्हणाले, की देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधींसोबत इतर क्रांतिकारकांचेही योगदान आहे. फक्त गांधीजींचेच एकतर्फी समर्थन करू नका, असे वादग्रस्त विधान त्यांनी काल केले होते. त्यानंतर आता आज पुन्हा राजकारणावर भाष्य करत विभिन्न विचाराचे लोक एकत्र आले, माझ्या त्यांना शुभेच्छा, असे वादाचे विधान राज्यपालांनी केले.
यापुर्वी ही राज्यपालांचे वादग्रस्त विधान
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत येतात. त्यांच्या विधानामुळे अनेकवेळा वाद सुध्दा निर्माण झाला आहे. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले, मुंबई आर्थिक राजधारी, महात्मा गांधींविषयीचे वादग्रस्त वक्तव्य अशा विविध कारणाने ते चर्चेत आले. त्यांच्या राजकीय वक्तव्ये आणि भूमिकांमुळे त्यांच्यावर सातत्याने टीकाही होत आहेत. आता कोणतेही वक्तव्य करणार नाही, असे ते अलिकडेच म्हणाले होते. मात्र त्या आजही थांबल्या दिसत नाहीत.