कुणाच्या बापाची हिंमत नाही, का म्हणाले फडणवीस असं?
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या विषयावर जुंपलेली दिसत आहे. त्यातच नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून गदारोळ निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकच्या विरोधात ठराव आज घेण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, मुख्यमंत्री दिल्लीला गेल्याने कर्नाटकविरोधात ठराव उद्या, मंगळवारी घेण्यात येईल, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना शांत केले.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून जाणीवपूर्वक वादग्रस्त विधाने करीत महाराष्ट्राला डिवचले जात आहे. परंतु महाराष्ट्र सरकार गप्प बसले असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला. त्यांनी जशास जसे उत्तर देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी बघ्याची भूमिका न घेता कर्नाटक सरकारला गंभीर इशारा देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्या ठराव घेणार असल्याचे सांगताच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आक्रमक झाले. भास्कर जाधव यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री वाट्टेल ते ठराव करीत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मान खाली घालुन बसल्याचा आरोप केला. यावर फडणवीस यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना मान खाली घालायला लावेल, अशी कुणाच्या बापाची हिंमत नाही, असे फडणवीस यावेळी म्हणाले.