'त्या' आरोपावरून अमृता फडणवीसांचा राऊतांना टोला; म्हणाल्या, एखादं चांगलं औषध...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे, त्यातच निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्ष चिन्ह हे शिंदे गटाला दिले. यामुळे आता शिंदे गटात आणि ठाकरे गटात संघर्ष वाढला आहे. त्यातच दुसरीकडे या निर्णयावरून शिंदे गटावर ठाकरे गट नेते संजय राऊत हे सर्वाधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु, या संघर्षादरम्यान, आज संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपारी देण्याचे गंभीर आरोप केले. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. त्यावरच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या आज ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी जेनेरिक औषधांसंबंधित एका कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवली. तेव्हा त्याठिकाणी माध्यमांनी त्यांना संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर प्रश्न विचारला असता. त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, "एखादं चांगलं औषध बनवा. जेणेकरून ते शांत होतील. महाराष्ट्रात शांती राहील. एकमेकांवर होणारी दगडफेक बंद होईल,” असा अप्रत्यक्ष टोला अमृता फडणवीस यांनी राऊतांना लगावला. पुढे त्यांनी ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं.
काय केले होते संजय राऊत यांनी आरोप?
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोलताना संजय राऊत यांनी एक ट्विट करत शिंदे गटावर आणि भाजपवर मोठा आरोप केला आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. माझी खात्रीची माहिती आहे. हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे, असा मोठा दावा त्यांनी केला आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.